सेंच्युरियन – एक माणूस, एक खेळाडू आणि एक क्रिकेटर म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्याची खरी कसोटी ही कसोटी क्रिकेटमध्ये लागते, असे वक्तव्य भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने येथे वाहिनीशी बोलताना केले. त्याच्या या वक्तव्यावरून तो अद्यापही वनडे विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यातील पराभवातून प्रतित होत आहे. असे असले तरी रोहित कसोटी मालिकेत विजय मिळवून विक्रमी कामगिरीसाठी सज्ज झाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे, त्यातील पहिला सामना सेंच्युरियन येथे खेळविला जाणार आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत आजतागायत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. महान भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली देखील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकून देऊ शकलेले नाहीत. आता रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेत होणार्या कसोटी मालिकेत प्रथमच टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार आहे. अशा स्थितीत रोहित शर्माने ही मालिका जिंकल्यास त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील ही मोठी उपलब्धी असणार आहे.
रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत नेले होते, पण तिथेही टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आता रोहित शर्मा २०२३-२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला अंतिम फेरीत नेणार का? हे पाहणे आता औस्तुक्याचे ठरणार आहे.
IND vs SA Test Series : ऋतुराजच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाले संघात स्थान…
रोहितची कसोटी कारकिर्द…
रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये आतापर्यंत एकूण ५२ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ८८ डावांमध्ये ४६.५४ च्या सरासरीने ३६७७ धावा केल्या आहेत. या कालावधीत रोहितने १० शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या २१२ इतकी राहिलेली आहे.