नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उर्वरीत तीन सामन्यांसाठी येत्या एक दोन दिवसांत संघ निवड होणार आहे. मात्र, इशान किशनचा समावेश होणार का याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे संभ्रम कायम राहिला आहे. इशानने पहिल्यांदा क्रिकेट खेळणे तसेच देशांतर्गत क्रिकेटचे काही सामने खेळणे गरजेचे आहे, असे द्रविड म्हणाले आहेत, त्यामुळे या उर्वरीत तीन सामन्यांसाठी संघ निवड करताना त्याच्या नावाचा विचार होणार का नाही हे अद्याप गुलदस्तातच आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील पहिले दोन सामने झाले आहेत. पहिला कसोटी सामना इंग्लंडने २८ धावांनी जिंकला. तर दुसऱ्या कसोटीत भारताने दमदार पुनरागमन करत इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १ – १ अशी बरोबरी केली. भारताने जरी दुसरा कसोटी सामना जिंकला असला तरी त्यात अनेक खेळाडूंची कामगिरी लौकिकास साजेशी झालेली नाही. भारताने या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीच आपला संघ जाहीर केला होता. आता पुढच्या तीन कसोटीसाठी निवसमिती एक दोन दिवसात संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर रोहित शर्मा आणि निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात दीर्घ चर्चा झाली. याचबरोबर राहुल द्रविड यांनीही इशान किशनने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरूवात करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्याचा संघ निवडीसाठी विचार करण्यात येईल. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत, असे म्हटले आहे.
#U19WorldCup2024 : रोमांचक सामन्यात ‘टीम इंडिया’चा विजय, आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत मारली धडक…
पहिल्या दोन कसोटीत श्रीकार भरतने भारतासाठी यष्टीरक्षण केले. मात्र त्याची फलंदाजीतील कामगिरी सुमारच होती. पहिल्या कसोटीतील ४१ धावांची खेळी वगळता त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे पुढच्या कसोटीत त्याच्यावर संघातून वगळण्याची टांगती तलवार असणार आहे. दरम्यान, सामना झाल्यावर कर्णधार रोहित आणि आगरकर यांच्यात देखील दीर्घ चर्चा झाल्याचे समजते. भारतीय संघातील अनेक खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. विराट कोहली देखील तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. याच पार्श्वभूमीवर निवडसमितीला आठवड्याभरात भारतीय संघाची घोषणा करणे गरजेचे आहे.
रणजी खेळणार की विश्रांती?
भारताच्या कसोटी संघातील खेळाडू श्रेयस अय्यर आणि केएस भरत यांनी सुमार कामगिरी केली आहे. दुसऱ्या कसोटीत विराट कोहली आणि केएल राहुल अनुपस्थित होते त्यामुळे या दोघांची संघात वर्णी लागली. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत ९ दिवसांचा कालावधी आहे. याचदरम्यान ९ फेब्रुवारीला रणजी करंडक स्पर्धेचा सामना होणार आहे. हा सामना १२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे निवडसमिती संघातील काही खेळाडूंना हा सामना खेळण्यास सांगू शकते. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएस भरत आणि रजत पाटीदारसाठी हा रणजी सामना सरावाची एक उत्तम संधी ठरू शकतो. दुसरीकडे पाहुणा इंग्लंड संघ अबूधाबीत परतणार असून तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडचा संघ अबूधाबीतच सराव करेल.
मी तसे बोललोच नाही – द्रविड
इशानने आधी देशांतर्गत क्रिकेट खेळावे तरच संघ निवडीसाठी त्याचा विचार केला जाइल या वक्तव्यावरून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी घुमजाव केले आहे. मी इशानला केवळ सल्ला दिला होता. त्याने आधी स्वतःजाहीर करावे की तो खेळण्यास तयार आहे. त्याला देशांतर्गत क्रिकेट किंवा कोणते क्रिकेट खेळायचे आहे याचा विचार त्यानेच करायचा आहे. मात्र, विश्रांतीचा कालावधी संपल्यावर कोणत्याही खेळाडूला लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास कठीण जाते त्यासाठीच त्याने बॅक टू द बेसीक हा नियम लक्षात ठेवावा, असे मी म्हणालो होतो ही पुष्टीही द्रविड यांनी जोडली आहे.