– अरुण गोखले
एकदा एक बाई महाराजाकडे आल्या. त्यांनी दर्शन घेतले आणि चटकन डोळ्याला पदर लावला. ते पाहून महाराजांनी मोठ्या आस्थेने त्यांना विचारले, ‘‘बाई! काय झाले असे डोळ्यात पाणी का?’’ त्यावर महाराजांची अनुमती घेऊन त्यांच्या समोर बसत त्या म्हणाल्या, ‘‘महाराज! नाही म्हणजे आजही माझा रोजच्या पाच माळांचा राम नामाचा जप हा निष्ठेने चालूच आहे पण…’’ ‘‘अहो पण काय! आपला जप हा नित्य चालू आहे ना. त्याच अनुसंधान कायम आहे ना मग झालं तर…’’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘नाही म्हणजे महाराज त्याचं काय होतंय गेल्या काही दिवसांपासून असं होतय की जप करायला सुरुवात केली. एक दोन माळा झाल्या की त्यानंतर जप करत असताना अचानक हातातली माळ केव्हा खाली गळून पडते ते कळतच नाही. हे असं माळ खाली गळून पडणं हे कशाचं लक्षण मानायचं? आपल्या हातून जप करताना माळ गळून पडतेय याचं ङ्गार दु:ख होतंय मनाला.’’
तेव्हा महाराज हसत हसत म्हणाले, ‘‘बाई! अहो जप करता करता हातातली माळ कधी खाली गळून पडते आहे हे तुमचं तुम्हालाही कळत नाही, होय ना? मग खरंच तसं जर होत असेल तर तुम्ही त्याचा आनंद मानायला हवा. त्यासाठी असं डोळ्यात पाणी काढण्याचं कारण काय? कारण असं घडतंय याचा अर्थ हाच की तुम्ही तयार व्हायला लागल्या आहात.
त्यावर त्या अधिकच चक्रावल्या. तेव्हा आपल्या बोलण्याचा नेमका अर्थ समजावून देत महाराज म्हणाले, ‘‘हे पाहा नीट लक्षात घ्या. ज्याप्रमाणे नव्याने पावलं टाकायला शिकणार्या लहान बाळाच्या हातात आपण पांगुळगाडा देतो. तो कशासाठी तर त्याच्या आधाराने त्याला स्वत:च्या स्वत: नीट पावलं टाकता यावीत म्हणून. तशी तुम्हाला दिलेली माळही तुमच्या मनाला ईश्वर नामाची गोडी आणि सवय लागावी यासाठी असते.
एकदा का मनाला नामात रमण्याची सवय लागली, की मग माळेचा पांगुळगाडा दूर गेला तर त्याचं दु:ख करण्याचं काय कारण आहे. नाहीतरी नाम जे मोजून नाही तर मन प्रभू प्रेमानी भरेपर्यंत करायचे असते. मग हातात माळ असो वा नसो. काय आलं का लक्षात?’’ महाराजांच्या त्या स्पष्टीकरणाने राधाबाईच्या मनावरचा ताण एकदम हलका झाला.