अहमदाबाद – बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिकेतील निर्णायक चौथ्या सामन्यात पहिले दोन दिवस पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने गाजविल्यानंतर तिसऱ्या दिवसावर दमदार फलंदाजीमुळे भारताचे वर्चस्व राहिले. शुभमन गिलचे शानदार शतक व विराट कोहलीने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने 3 बाद 289 धावा केल्या आहेत.
चांगली गोष्ट म्हणजे दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली 59 धावांवर तर रवींद्र जडेजा 16 धावांवर खेळत आहेत. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे भारत अद्यापही ऑस्ट्रेलियापेक्षा 191 धावांनी पिछाडीवर आहे.
के.एल.राहुलच्या जागी संघात संधी मिळाल्यानंतर गिलने 235 चेंडूत 128 धावांची शानदार खेळी करताना संधीचे सोने केले. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकारही मारला. यासह 23 वर्षीय गिलने अनेक विक्रम आपल्या नावे केले. मात्र, अहमदाबाद कसोटीत शतकानंतरही एक सल मनात राहिल्याचं शुभमन गिलने सांगितलं.
यावेळी बोलताना शुभमन गिल म्हणाला की, ‘मला वाटत होतं की क्रीजवर बराच वेळ खेळल्यानंतर मी बचावात्मक आणि खूपच सावध होत होतो. आता जितका वेळ शक्य होईल तितका वेळ मला फलंदाजी करावी लागेल असा विचार करत होतो. मी स्वत:ला खूप दबावात टाकत होतो.
हा माझा नैसर्गिक खेळ नव्हता. मी नैसर्गिक खेळ खेळताना बाद झालो असतो तर ठीक होतं. पण अडचण अशी होती की बचावात्मक खेळण्याच्या प्रयत्नात मी बाद होत होतो. त्यामुळे मला स्वत:ला समजवावं लागलं की स्वत:वर दबाव न टाकता मोठी खेळी खेळणे योग्य आहे’. असं तो म्हणाला.