भारतीय संघ निवड आता विनोदी पद्धतीने केली जात असल्याचा संशय बळावत चालला आहे. सतत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला संघाबाहेर काढले ते बरे झाले. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमीला वगळण्याचे कारणच काय होते. त्याला म्हणे विश्रांती दिली गेली आहे.
हा विश्रांती शब्द सध्या भारतीय संघाच्या बाबतीत जरा जास्तच गांभीर्याने घेतला जात आहे. असे किती कसोटी सामने शमीने खेळले की त्याला विश्रांतीची गरज आहे. तिसरा कसोटी सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असताना हे असे निर्णय घेण्यामागे काय विचार असेल. मुळातच संघ निवड करताना कोणी विचार करतो का, हाच प्रश्न आहे. 100, 150 काय तर तब्बल 200 कसोटी सामने खेळणारे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे खेळाडू कधी विश्रांती घेताना दिसले होते का. त्यावेळी तर भारतीय संघ एकाच मोसमात जास्त कसोटी सामने खेळत होता. आज ते प्रमाण अगदीच नगण्य आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्यामुळे काही सामन्यांची संख्या वाढली आहे, पण तरीही कोणत्या खेळाडूला कधी व कोणत्या संघाविरुद्ध विश्रांती द्यावी हे कर्णधार व प्रशिक्षकाला समजू नये याचे आश्चर्य वाटत आहे. उलट ही कसोटी मालिका जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची रंगीत तालीम ठरत असल्याने प्रत्येक सामन्यात आपला सर्वोत्तम संघच खेळवला गेला पाहिजे, तरच ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कच्चे दुवे हेरता येतील.
ऑस्ट्रेलिया संघातही त्यांचे काही प्रमुख खेळाडू नाहीत, हे खरे आहे, पण ते अजिंक्यपद सामन्यासाठी नव्हे तर आगामी ऍशेस कसोटी मालिकेसाठी वेगवेगळी कारणे देत आहेत, हे तर उघड आहे. भारताविरुद्धची मालिका ऍशेसपेक्षाही महत्त्वाची असल्याचे ते कितीही म्हणत असले, तरीही त्यांच्यासाठी ऍशेस हाच प्रतिष्ठेचा विषय असतो.
इंदूरच्या खेळपट्टीवर थोडे गवत राखले गेले आहे. त्यामुळे मुळातच स्विंगसाठी ओळखल्या जात असलेल्या शमीला रिव्हर्स स्विंगही मिळाला असता. उमेशकडे वेग आहे, पण स्विंग नाही. त्यामुळे शमीला खेळवले गेलेच पाहिजे होते व राहुलच्या जागी गिल हा एकच बदल अपेक्षित होता. अनाकलनीय निर्णयाची परंपरा रोहित-द्रविडने याही कसोटीत कायम राखली, दुसरं काय.