मुंबई – काही महिन्यांपासून राज्यातील अनेक मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.
फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे.
विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेत आपला विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प हैदराबादलामध्ये वळवला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट टाकणार होती.
या ठिकाणी वर्षाला 250 विमानांची इंजन दुरुस्ती व देखभाल केली जाणार होती. त्यासाठी कंपनीची 1 हजार 115 कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. मात्र, हा रोजगार आता गेला आहे. प्रशासकीय विलंबामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. कंपनीचे सीईवो यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे.
फ्रान्सची बहुराष्ट्रीय सॅफ्रन कंपनी दोन वर्षांपासून नागपुरच्या मिहानमध्ये प्रकल्पासाठी जमिनीची चाचपणी करत होती. मात्र, त्यांना आवश्यक तशी जमीन या ठिकाणी उपलब्ध झाली नसल्याची माहिती मिळते आहे. या कंपनीने दोन शहरांचा पर्याय ठेवला होता. यामध्ये एक नागपूर आणि दुसरा हैदराबाद.
मात्र, मिहानमध्ये जमिनीची चाचपणी करत असताना त्यांना असं जाणवलं की जमीन मिळायला उशीर लागत आहे. तसेच महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता देखील आहे. त्यामुळे सॅफ्रन कंपनीने आपला प्रकल्प अखेर हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
सत्तेच्या हव्यासापोटी वातावरण अस्थिर
सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केले असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. 2014 नंतरच महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का? असा सवालही लोंढे यांनी उपस्थित केला आहे. वेगळा विदर्भ करण्याच्या नावावर सत्तेत आलेले लोक, वेगला विदर्भ तर सोडाच पण विदर्भावर किती अन्याय करतात हा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्रात पाण्याची विजेची मुबलकता आहे. तसेच आपल्याकडे कौशल्य असलेले मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे, तरी प्रकल्प राज्याच्या बाहेर जात आहे. प्रकल्प राज्याबाहेर जाणे म्हणजे हा राजकीय करंटेपणा असून सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचे सरकारने नुकसान केल्याचे लोंढे म्हणाले.