उद्धव ठाकरे ः दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच योजना
मुंबई : काहींचे म्हणणे आहे की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेल्याने आम्ही हिंदुत्व सोडले आहे. पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही. आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेनेने कधीच झेंड्याचा रंग बदलला नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, आमदारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सीएए आणि एनआरसीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना भूमिका विषद करून सांगितली. ते म्हणाले, मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही.
कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदललेला नाही. एक माणूस एक झेंडा हे आमचे ठरलेले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने जनतेच्या हितासाठी आरोग्यसेवा, शिवभोजन, कर्जमुक्तीसह अनेक योजना जाहीर केल्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचायला हव्यात. हे राज्य जनतेचे आहे. तेव्हा जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, आमदारांना दिल्या.
कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी मार्चपासून सुरू होऊन एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. दोन लाखांवर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे, त्याचप्रमाणे जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी योजनेचा तपशील ठरलेला आहे. ही योजना लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. गरजू शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळायला हवा यासाठी आमदारांनी स्वत: त्यांच्यांपर्यंत पोहोचायला हव्यात यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले.
आमदार वायकर यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी
ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न त्या त्या जिल्ह्यात, विभागात सुटावेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. यासाठीची समन्वयाची जबाबदारी आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे देण्यात आली आहे. सामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयांच्या माध्यमातूनच सुटायला हवेत. त्यांना हे प्रश्न घेऊन मुंबईपर्यंतचा हेलपाटा घालण्याची वेळ येता कामा नये याची काळजी आमदार आणि प्रशासनाने घ्यायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.