नवी दिल्ली – भगव्या, हिंसक आणि असहिष्णुतेने माझा नवा भारत बनू देणार नाही; तो विटा-दगडांचाही बनणार नाही, तर जिथे नवनव्या कल्पना फुलतील आणि रंगांचा वर्षाव होईल अशा जनतेच्या आकांक्षा नवीन भारत घडवतील, असे माजे केंद्रिय मंत्री आणि राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
रविवारी भारताला संसदेची नवी इमारत मिळाली. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याबाबत राजकीय गदारोळ झाला होता. आजही राजकारण सुरूच आहे. आता राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. नवा भारत हा विट-दगडांचा नसून 140 कोटी लोकांच्या आकांक्षांसह विचारस्वातंत्र्याचा असेल, असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले होते की नवीन संसद भवन हे नवीन भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे आणि स्वावलंबी राष्ट्राच्या पहाटेचा दाखला आहे. हे विकसित भारताकडे (विकसित भारत) आपल्या प्रवासाचे साक्षीदार असेल.
नवी संसद 140 कोटी लोकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांना मूर्त रूप देते, असे मोदी म्हणाले होते. हे भारताच्या अटल निर्धाराबद्दल जगाला एक शक्तिशाली संदेश देते. मात्र, मोदींच्या या विधानांची खिल्ली सिब्बल यांनी उडवल्याने त्यांनाही नव्या संसदेचा निर्णय खुपला असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.