प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 – ढोल-ताशांच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात पुण्यातील 25 हजारांहून अधिक युवक-युवती एकत्र येतात. यंदा करोना संकटानंतर दोन वर्षांनी एकत्र आलेल्या वादकांपैकी 175 भगव्या ध्वजधारकांनी ढोल-ताशांच्या तालावर ध्वज नाचवत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मानवंदना दिली.
ढोल ताशा महासंघातर्फे बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संजय सातपुते, अनुप साठ्ये, ऍड. शिरीष थिटे, अमर भालेराव, आशुतोष देशपांडे, अमित रानडे, कौस्तुभ कुदळे आदी उपस्थित होते. रणी फडकती लाखो झेंडे… या गीताचे समूहगान करीत वादकांनी स्वातंत्र्याचा जयजयकार केला. भगवे ध्वज नाचवित असताना भारत माता की जय… वंदे मातरम्… च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यानिमित्ताने पुण्यातील विविध पथकांतील ध्वजधारकांचे एकत्रित ध्वज संचलन आणि प्रात्यक्षिक तसेच मर्दानी खेळांचे सादरीकरण देखील झाले.
भगव्याचेही महत्त्व
ढोल-ताशा पथकाच्या अग्रभागी ध्वज पथक असते. ध्वजाचे अनन्यसाधारण महत्व आहे. ढोल-ताशा पथकातील प्रत्येक वादक ध्वजाला वंदन करुनच वादनाला प्रारंभ करतो. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगी ध्वजासह भगव्या ध्वजाचे महत्व आणि इतिहास देखील वादकांना समजावा, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे ठाकूर म्हणाले.