सातारा – सातारा तालुक्यातील रेशन दुकानांचा धान्य वाटपाचा निधी शासनाकडे अडकून राहिल्याने दुकानदार अडचणीत आले आहेत. शिधा पुरवठ्यासाठी उसनवारी केल्यानंतर पुढे धान्य पुरवठाच न झाल्याने दुकानदारांची अवस्था “….हाती आले धुपाटणे’ अशी झाली आहे. शासनाने हे पैसे तात्काळ द्यावेत, या मागणीसाठी रेशन दुकानदार संघटना आक्रमक झाली आहे.
तब्बल 210 रेशन दुकानदारांचे दहा कोटी रुपये शासनाकडे अडकले आहेत. हा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी त्यांची मागणी आहे. करोनाच्या काळात सरकारने सर्वसामान्य नागरिकांना धान्य पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले. केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्राधान्य कुटुंब योजनेत मोफत धान्य वाटप करण्यात आले. केशरी कार्डधारकांना राज्य शासनाने आठ रुपये किलो दराने गहू, 12 रुपये किलो दराने तांदूळ माणशी अनुक्रमे तीन व दोन किलोप्रमाणे वाटप केले. जून महिन्यापर्यंत हे वाटप व्यवस्थित सुरू होते.जुलै महिन्याच्या वाटपासाठी सातारा तालुक्यातील दुकानदारांनी कर्जे काढून रेशन आणायला पैसे भरले.
शासनाच्या तिजोरीत 20 जूनला पैसे जमा केले; परंतु जुलै महिन्यात सरकारकडून धान्यपुरवठा झाला नाही. त्यामुळे ग्राहकांनी दुकानदारांना सतावले. त्यातून वाद होऊ लागले. संपूर्ण ऑगस्ट महिना, अर्धा सप्टेंबरा गेला तरी केशरी कार्डधारकांचे धान्य आले नाही की, सरकारच्या तिजोरीत दुकानदारांनी भरलेले पैसेही परत मिळाले नाहीत. सातारा तालुक्यातील 210 रेशन दुकानदारांचे दहा कोटी रुपये शासनाकडे अडकल्याने हे दुकानदार कोंडीत सापडले आहेत.
पैसे नाहीत, रेशन तरी मिळावे
रेशन दुकानदाराना सरकारने कोणतीही सुविधा दिली नाही. सॅनिटायझर, मास्क नाही. रेशन देताना “पॉस’ मशीनवर ग्राहकांचा अंगठा घेणे करोनाच्या भीतीमुळे अडचणीचे झाले आहे. 70 दुकानदारांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील काही जण बरे झाले आहेत. काही जणांवर उपचार सुरू आहेत. मोफत वाटलेल्या धान्याचे कमिशनही दुकानदारांना देण्यात आलेले नाही. आमचे पैसे परत द्या किंवा वाटपासाठी धान्य द्या, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.