नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमधील मिनी सचिवालयावर आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत फायरिंग केली. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आले. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला.
मिनी सचिवालयातून पळ काढल्यानंतर दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसराचा लपण्यासाठी आसरा घेतला. त्यानंतर जादा फोर्स मागवत त्या संपूर्ण परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी तपास अभियान सुरु केलं आहे. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली नाही. तसेच आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचीही माहितीही मिळालेली नाही. गोळीबार झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे.
Jammu and Kashmir: Terrorists attack a CRPF party deployed at South Kashmir's mini secretariat. No casualties or injuries reported so far. The area has been cordoned off. More details awaited.
— ANI (@ANI) September 25, 2020
काश्मीरमधून दररोज सीमाभागांत सीजफायरचे उल्लंघन किंवा दहशतवादी हल्ल्याचे वृत्त समोर येत आहे. याचदरम्यान, भारताने सीआयसीएच्या डिजिटल बैठकीत काश्मीर मुद्द्या उपस्थित केल्यामुळे गुरुवारी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. तसेच इस्लामाबादला ‘थेट आणि अप्रत्यक्ष’ सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करण्याचा सल्ला देण्यात आला. या मुद्द्यावर पाकिस्तानवर निशाणा साधत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, पाकिस्तानने आणखी एका मंचाचा उपयोग भारताबाबत आपले चुकीचे विचार व्यक्त करण्यासाठी केला आहे.
पाकिस्तानने आशियातील सहभाग आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या उपाययोजनांसाठी असलेल्या परिषदेच्या मंत्रीमंडळ बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. सीआयसीए 27 देशांचा आंतरराज्यीय मंच आहे. या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी केलं. दरम्यान, विदेश मंत्रालयाने आपल्या वक्तव्यात म्हटलं की, भारताच्या अंतर्गत बाबींविषयी भाष्य करण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही. तसेच पुढे बोलताना मंत्रालयाने स्पष्ट केले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील.