फळावर काळे डाग, मुरुकुटा, कोळीचा प्रादुर्भाव : पुरंदरचा बळीराजा अडचणीत
पावसाअगोदर प्रति किलो 80 ते 90 : सध्या 15 ते 20 रुपये दर
वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी परिसरात अंजिराचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या अंजीराच्या “खट्टा’ बहाराला सुरुवात झाली आहे; मात्र सततच्या पडत असलेल्या पावसामुळे अंजीर हे रोगाच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. पावसामुळे अंजीराच्या फळावर काळे डाग, मुरूकुटा, आणि कोळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
येथील अंजीर बागांवर अतिवृष्टी, सतत ढगाळलेले वातावरण व यामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने अंजीर पिकांवर करपा, तांबेरा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे फळ पिवळे पडून गळू लागले आहे. वाल्हे परिसरातील आडाचीवाडी, सुकलवाडी येथील शेतकऱ्यांचे अंजीर हे प्रमुख पीक आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अंजिराच्या फळबागा आहेत. हमखास उत्पन्न मिळवून देणारे हे पीक असल्याने याचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते. सध्या खट्टा बहार आहे. दररोजचा पाऊस व बदलत्या हवामानाचा परिणाम अंजिराच्या बाजारपेठेवर झाला आहे. हजारो रुपये खर्च करून देखील प्रमाणात आर्थिक उत्पन्न येत नसल्याने शेतकरी वर्गात चिंताग्रस्त होत आहेत.
मागील 10 ते 15 दिवसापर्यंत सर्वच अंजीर बागा औषध फवारणीने सुस्थितीत होत्या; मात्र मागील काही दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस, वातावरणातील बदलाने होत असलेले ढगाळ हवामान व यामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने अंजीरच्या फळावर व पानावर विपरीत परिणाम होत आहे.
वातावरण अंजीर बागांना हानिकारक ठरत असून यामुळे फळांचा आकार वाढत नाही. अंजीर उत्पादकांना योग्य तो बाजार भाव मिळत नाही. परतीचा पाऊस पडण्याआगोदर अंजिराला प्रति किलो 80 ते 90 रूपये प्रति किलो बाजारभाव मिळत होता; मात्र पावसानंतर अंजीर खराब झाल्यामुळे, तो बाजार आता 15 ते 20 रुपयांवर येऊन ठेवपला असल्यामुळे शेतकऱ्याला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
50 ते 60 टक्क्यांपेक्षा अधिक घट
अंजिराच्या उत्पन्नामध्ये जवळपास 50 ते 60 टक्क्यांपेक्षा अधिक घट होत असून अंजीर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बागांवर झालेला खर्चदेखील निघणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंजीर उत्पादक शेतकरी सूर्यकांत पवार, संभाजी पवार, विलास पवार, महेश पवार आदी शेकऱ्यांनी सांगितले.