पुणे, दि. 16 -चारच दिवसांवर दिवाळी आल्याने आणि तत्पूर्वी शनिवार, रविवार हे दोनच दिवस खरेदीचे मिळाल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली. पर्यायाने लक्ष्मी रस्त्यासह प्रमुख बाजारपेठांच्या रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली.
गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने लोकांच्या खरेदीवर अक्षरश अंकुशच आणला होता. सामान्यत: नागरिक खरेदीसाठी सायंकाळी बाहेर पडतात. त्याच दरम्यान म्हणजे सायंकाळी पाच-साडेपाच वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात होत असल्याने नागरिकांचा खोळंबा होत होता. मात्र शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी उघडीप मिळाल्याने अगदी दुकाने उघडण्याच्या म्हणजे सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच नागरिकांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली.
दिवाळी सण मोठा असल्याने या काळात दुकानांमध्ये नवा, लेटेस्ट फॅशनचा स्टॉक भरला जातो. त्यामुळे लग्नासाठीची नवरा-नवरीची खरेदीही या काळात बहुतांश जण करतात. त्यामुळे साड्यांचा रंग, पोत, हव्या तशा साड्या, पोषाख, दागिने आणि अन्य सामग्री हवी तशी मिळते, व्हरायटीही पाहायला मिळते. त्यासाठी या काळात सणासुदीच्या सोडून अन्य समारंभाचीही खरेदी केली जाते. त्यांचीही गर्दी सध्या दुकानांमध्ये सुरू आहे.
याशिवाय सणासाठी लागणाऱ्या पणत्या, आकाशकंदील, रांगोळी, फटाके, दिव्यांच्या माळा खरेदीसाठीही बाजारपेठेत झुंबड उडाली होती. याशिवाय मोबाइल, लॅपटॉप, टॅब, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कार, टूव्हिलर यांसारख्या बड्या किमतीच्या वस्तूंच्या दुकानांमध्येही गर्दी झाली. त्यामुळे रस्ते लोकांनी फुलून गेले आणि पर्यायाने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.