पुणे, दि. 16 -ज्या वयात पाठीवर शाळेची बॅग, हातात पेन पाहिजे त्या वयात अल्पवयीन मुले हातात कोयते घेऊन पाठीवर वार करण्यास धजवत नाहीत. अशा बालगुन्हेगारांचे पुणे पोलिसांकडून “बालस्नेही’ पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून मन आणि मतपरिवर्तन करण्यात येत आहे. पोलिसांनी शहरातील अशा 28 मुलांचे समुपदेशन करून त्यांच्या हातातील कोयते काढून त्यांना कुटुंबाचं “आधार’ बनवलं आहे. ही मुलं आता कामधंदा करून कुटुंबाचा गाडा हाकताहेत.
शहरातील गंभीर गुन्ह्यांसोबतच रस्त्यांवरील गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा समावेश वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही मुलं खून, खुनाचा प्रयत्न यासोबतच दहशतीसाठी वाट्टेल ते करत आहेत. कोवळ्या वयातील मुलांचा हा सहभाग पालकांसोबतच पोलीस आणि समाजासाठी चिंताजनक आहे. वाहनांची तोडफोड, मुलींची छेडछाड व एकतर्फी प्रेमप्रकरण तसेच खुन्नस यावरून एकमेकांना भिडत आहेत. पाठिवर दप्तराऐवजी रक्तांचे डाग आणि पेनाऐवजी हाती कोयते घेऊन गुन्हेगारी जगतात ती भरकटताहेत.
गुन्हेगारीत आलेली ही मुलं व्यसनांच्या देखील आहारी गेली आहेत. दारू अन् सिगारेट हे त्यांचं स्टेट्स बनलं आहे. ना कुटुंबाचा धाक, ना समाजाची भीती यामुळे ही मुलं गुन्हेगारीत आपणच इथले “भाई’ असे वावरताना दिसतात. वेळीच या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. यासाठी कुटुंब, पोलीस आणि समाजाला एकत्रित काम करावे लागणार आहे. केवळ पोलिसांवर अंवलबून हा विषय सोडता येणार नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी “मोक्का’ व “एमपीडीए’चा प्रभावी वापर केला. पण, निरीक्षणातून बाल गुन्हेगारीचे प्रमाण देखील लक्षात आले. कोवळी मुलं यात ओढली जात असल्याचे समोर आल्यानंतर आयुक्तांनी बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी देखील प्रयत्न सुरू केले. उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या देखरेखेखाली 20 नोव्हेंबर 2021 मध्ये “बालस्नेही पोलीस ठाणी’ सुरू केली. होप फॉर दि चिल्ड्रेन फाउंडेशनच्या मदतीने हे काम चालते.
70 मुलांचे समुपदेशन
“बालस्नेही’च्या माध्यमातून गेल्या नऊ महिन्यांत पोलिसांनी तब्बल 70 मुलांचे समुपदेशन केले. त्यातील 28 मुलांना पोलिसांनी बाल गुन्हेगारीतून पूर्णपणे बाहेर काढले आहे. तर 8 मुलांना गुन्हेगारीतून बाहेर काढत त्यांना नोकरी देखील मिळवून दिली आहे. तसेच काही मुल पोलीस ट्रेनिंग घेत आहेत. तर काही इलेक्ट्रीकचा डिप्लोमा करत असून, एक बारावीचे पुन्हा शिक्षण घेऊ लागला आहे. त्यामुळे ही मुलं आता कुटुंबाचा आधार बनली आहेत.
असे चालते ‘बालस्नेही’चे काम
तीन टप्प्यांत हे काम चालते
पहिल्या टप्यात लेक्चर, समुपदेशन, पथनाट्यांच्या माध्यमातून मुलांचे मतपरिवर्तन. कुटुंबीयांनाही यात सहभागी करून घेतले जाते.
दुसऱ्या टप्प्यात तज्ज्ञांकडून समुपदेशन. मुलांमधील पोलिसांची भीती नाहीसी व्हावी, यासाठी ठाण्याच्या परिसरातच हे समुपदेशन
तिसऱ्या टप्प्यात वयोगट 10 ते 16 मुलांचे वर्गीकरण केले जाते. मुलांच्या खेळाच्या आवडीनिवडीची माहिती करून घेतली जाते. “सीएसआर’मधून मदत मिळवून देत त्यांना ट्रेनिंगसाठी पाठविण्यात येते
खेळामुळे आपोआप शिस्त येईल आणि त्यांचा गुन्हेगारीतील सहभाग देखील कमी होईल, हा मुख्य उद्देश आहे.