पुणे, दि. 18 -मार्केट यार्डात चायनीज भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि पुरवठादारांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डमी आडत्यांकडून ही फसवणूक झाली आहे. लाखो रुपये थकीत असून, पैशांची मागणी केल्यास दमदाटी केली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यामध्ये परप्रांतीय डमी व्यापाऱ्यांचा समावेश आहे. हे व्यापारी कोणाच्या आशिर्वादाने बाजार समितीमध्ये विनापरवाना व्यवसाय करत आहेत, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही बाब शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. बाजार समिती यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकरी म्हणतात…
एका घटनेमध्ये शेतकऱ्याची सुमारे 35 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. खेड तालुक्यातील दोंदे गावचा हा शेतकरी असून, त्यांचे नाव सिद्धार्थ कोहिनकर आहे. ते म्हणाले, “”प्रामाणिकपणे शेती करून माल विक्रीस आणतो. मी दहा एकर शेतीमध्ये विविध प्रकारच्या चायनीज भाज्यांचे उत्पादन घेत आहे. मार्केट यार्डातील तरकारी विभागातील 535 आणि 495 क्रमांकाच्या गाळ्यावर भाजीपाला विक्रीस पाठविला. मात्र, या ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत हिशेब पट्टी न देता केवळ कागदाच्या चिठ्ठीवर व्यवहार होत होता. काही पैसे रोखीने आणि “गुगल पे’द्वारे मिळाले. आता मात्र पैसे देण्यास विलंब होत आहे. पैसे मागण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांना फोन केले, तर तर उडवाउडवीची आणि धमकीची भाषा वापरतात. याबाबत आम्ही बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.”
पुरवठादार म्हणतात…
पुरवठादार शेतकरी कैलास जाधव (मोहगांव, ता. जि. नाशिक) म्हणाले, “”माझे आठ लाख रुपये थकीत आहेत. मात्र, तडजोड केल्यानंतर व्यापाऱ्याने पाच लाख रुपये देण्याचे मान्य केले. याबाबत स्टॅम्प पेपरवर करार देखील करून घेतला. मात्र पैसे मिळाले नाहीत. याबाबत बाजार समिती देखील वारंवार संबंधित व्यापाऱ्याला तंबी देत आहे. मात्र अद्याप पैसे मिळालेले नाहीत. सात-आठ वर्षांपासून पुणे बाजार समितीमध्ये माझा स्वतःचा आणि मी संकलित केलेला परदेशी भाजीपाला विक्रीसाठी आणत आहे. अनेक दिवस काही आडत्यांच्या गाळ्यांवरील व्यापाऱ्यांकडे नियमित भाजीपाला पाठवित आहे. मात्र दोन तीन व्यापाऱ्यांकडून पैसे थकवले जात आहेत. याबाबत बाजार समितीकडे सातत्याने तक्रार केली, काही प्रमाणात पैसे मिळवून देखील दिले. मात्र करोना काळात गेल्या दोन तीन वर्षांपासून हे व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत.”
शेतीमालाचे पैसे न दिल्याच्या तक्रारी शेतकरी आणि पुरवठादारांकडून आल्या आहेत. बाजार समिती शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करत आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई केली जाईल.
– बाबासाहेब बिबवे, तरकारी विभागप्रमुख, बाजार समिती
पहिलाच अनुभव वाईट
सिद्धार्थ कोहिनकर या शेतकऱ्याने पहिल्यांदाच शेतीमाल विक्रीसाठी मार्केट यार्डात आणला होता. त्यावेळी शेतीमालाचे पैसे न मिळाल्याचा वाईट अनुभव त्यांना आला. त्यानंतर त्यांनी दादर बाजारात माल पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विभागात पुणे बाजार समितीचे नाव खराब होण्याची शक्यता आहे.