राजगुरूनगर – प्रतिपंढरपूर समजल्या जणाऱ्या कडूस (ता. खेड) येथे आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने गावातील मुस्लीम समाजाने या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचा निर्णय घेतला असून गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक व एकात्मतेचे घडवून समाजापुढे एक चांगला आदर्श घातला आहे.
आषाढी एकादशी व बकरी ईद गुरुवारी (दि. 29) आहे.विठ्ठलाची आणि आषाढीची प्रत्येकाला आतुरता लागून आहे. मात्र यावर्षी आषाढी एकादशी वेगळी ठरणार आहे. बकरी ईद आणि आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर कडूस शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कडूस ग्रामस्थ यांच्या माध्यमातून कडूस येथील मशिदी मध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कडूस गावातील मुस्लीम समाजाने या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कौतुक होत आहे.
कडूस ही तालुक्यातील मोठी बाजारपेठे आहे. तर हे गाव संवेदनशील गाव म्हणून ओळखले जात आहे. प्रतिपंढरपूर म्हणून कडूस गाव राज्यात प्रसिद्ध आहे; मात्र या ठिकाणी कुठल्याही छोट्या-मोठ्या घटनांचे रूपांतर मोठ्या घटनांमध्ये होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीने नेहमीच खबरदारी घेतली जाते. यावेळी हिंदू मुस्लीम ग्रामस्थांनी एकत्र बैठक घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
यावेळी सरपंच शहनाज तुरुक शेख, उपसरपंच अनिकेत धायबर, उद्योजक अभिनाथ शेंडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडलिक, बारकु गायकवाड, विजया नाईक, संजय धायबर, अनिल जाधव, कैलास कालेकर, सुनिल धायबर, मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी मुनाफ मोमिन, हनिफ मोमिन, परवेज मोमिन, दगडू शेख, सरदार मोमिन, शकिल मन्यार, अबजल मोमीन, अन्वर मोमीन, राजू मोमीन, मजर मोमीन आदींसह हिंदू-मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.