सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विनाविलंब विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली. त्यामुळे गडबडीने काश्मीरात निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे.
कलम 370 शी संबंधित प्रकरण 11 जुलै रोजी सूचीबद्ध आहे आणि त्यानंतरच ते या याचिकेवर सुनावणी करतील, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.
हर्षदेव सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया पुनर्संचयित करण्यासाठी लवकरच विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती.
ते म्हणाले होते की, लोकांना लोकशाही अधिकारांपासून फार काळ वंचित ठेवता येणार नाही. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये निवडून आलेले सरकार असणे आवश्यक आहे जे समस्या सोडवण्यासाठी काम करेल.