पुणे – शासनाने स्वतःच्या विभागात तेही करोनाच्या लढाईत अग्रभागी असलेल्या अंगणवाडी ताईंना मानधनाविना ठेवले आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मार्चचे मानधन तर अद्याप अदा करण्यात आलेले नाहीच. पण, फेब्रुवारीचे मानधनही थकलेले आहे. त्यामुळे ऐन लॉकडाउनमध्ये अंगणवाडी ताई हवालदिल झाल्या आहेत.
करोनाविषयक सर्व्हे, लोकशिक्षण, सल्ला इ. चे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी ताईंना अनेक ठिकाणी करावे लागत आहे. करोनाशी संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी, आशा वर्कर यांना 50 लाखांचे सुरक्षा कवच जाहीर झाले आहे. पण, अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी शासनाने भेदभाव केला. अंगणवाडी सेविकांना निम्म्याच म्हणजे 25 लाखांचे तेही संघटनांच्या मागणीनंतर सुरक्षा कवच देण्याचे प्रस्तावित केले. मानधनवाढीचा फरकही अंगणवाडी ताईंना अद्याप मिळाला नाही. याविषयी प्रकल्प पातळीवर चौकशी केली असता, प्रकल्प अधिकाऱ्यांनी हजेरी पत्रके तपासून दिली आहेत, असे सांगतात. तर काय आयुक्त कार्यालय मागच्या (फेब्रुवारी) महिन्याचे मानधनासाठी तरतूद नाही असे उत्तर देते.