नवी दिल्ली – भारतात सोयाबीनचे उत्पादन जास्त झाले आहे. त्याचबरोबर परकीय चलन वाचविण्यासाठी केंद्र सरकार यावर्षी कमी प्रमाणात सोयाबीनला आयात करण्याची परवानगी देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार यावर्षी सोयाबीनची आयात 64 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 2 लाख टन होणार असल्याचे बोलले जाते.
सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी भारताने 5.55 लाख टन सोयाबीनची आयात केली होती. गेल्या वर्षी भारतात सोयाबीनचे 118 लाख टन उत्पादन झाले होते. यावर्षी हे उत्पादन 120 लाख टन होण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सध्या भारतात 25 लाख टन सोयाबीन शिल्लक आहे.
या परिस्थितीचा विचार केला तर भारत सरकार जास्त सोयाबीन आयात करू देणार नाही असे समजले जाते. गेल्या वर्षीचे शिल्लक सोयाबीन आणि आताच्या हंगामात उत्पादन झालेले सोयाबीन पाहता भारताकडे वापरासाठी 147 लाख टन सोयाबीन असणार आहे.
गेल्या वर्षी हे प्रमाण केवळ 126 लाख टन होते. त्यामुळे भारताकडून सोयाबीनची आयात वाढली होती. या उलट भारत यावर्षी एक लाख टन सोयाबीनची निर्यात करण्याची शक्यता आहे. 100 लाख टन सोयाबीनचा वापर तेल उत्पादनासाठी करण्यात येणार आहे. तर 13 लाख टन सोयाबीन पेरणीसाठी राखून ठेवले जाणार आहे.