पुणे – राज्य शासनाने शेतकऱ्यांना पिकांची नोंद आता मोबाइल ऍपद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ई-पीक पाहणी ऍपमध्ये नोंदविलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगामात राज्यात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे घेतले जात असल्याचे समोर आले. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र 38 लाख 4 हजार हेक्टर आहे.
त्याखालोखाल 19 लाख 75 हजार हेक्टरवर कापसाची लागवड होत आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भात हे पीक असून त्याचे क्षेत्र 9 लाख 19 हजार हेक्टर इतके आहे. राज्यात तूर पिकाचे क्षेत्र 4 लाख 40 हजार हेक्टर इतके आहे. त्याखालोखाल राज्यात 3 लाख 86 हजार हेक्टरवर मका पीक आहे. ई-पीक ऍपमुळे पिकांचे लागवडीखालील क्षेत्र, त्यामधील पिके यांची अचूक माहिती उपलब्ध होत आहे.
अशी होते नोंद
शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई पीक पाहणी या मोबाइल ऍपद्वारे फोटो अपलोड करत आहे. या मोबाईल ऍपमध्ये अक्षांक्ष व रेखांशची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजणार आहे. तलाठ्यांकडून या फोटो व स्थानाची पडताळणी होणार असून, त्यानंतर शेतातील पिकांची नोंद संबधित शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर होत आहे.
नगदी पिकांमध्ये ऊस पिकाचे क्षेत्र आघाडीवर
बारमाही पिकांच्या नोंदणीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. राज्याच्या सर्वच भागात सुमारे एकूण पीक नोंदणीपैकी 2 लाख 12 हजार 595 हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर केळी, तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री या फळाची नोंदणी झाली आहे. केळी चे क्षेत्र 91 हजार 665 हेक्टर असून संत्रीचे क्षेत्र 71 हजार 827 हेक्टर, मोसंबीचे क्षेत्र 37 हजार 141 हेक्टर आणि द्राक्षाचे क्षेत्र 36 हजार 483 हेक्टर इतके आहे.
580 पिकांच्या नोंदी
ई पीक पाहणी या मोबाइल ऍपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने नव्याने सुमारे 250 पिकांची नोंद सात-बारा उताऱ्यावर होऊ लागली आहे. ऍपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये 18 वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉलिहाऊस मधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या ऍपमध्ये 580 पिकांच्या नोंदी घेता येत आहेत.