Rahul Gandhi on Shivsena – राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या यात्रेला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला असून हेच चित्र महाराष्ट्रात देखील दिसत आहे. महाराष्ट्रातील विरोधीपक्षात असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला आहे. राज्यात सत्तापालट होऊन महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर देखील काँग्रेस व राहुल गांधी यांच्यासोबत शिवसेनेने साधलेली जवळीक अद्याप कायम असल्याचं या यात्रेतून दिसलं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मानणाऱ्या पक्षातील बड्या नेत्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला आहे. अशातच आज राहुल गांधी यांनी अकोल्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेत पडलेल्या फुटीबाबत भाष्य करताना एक तर्क मांडला आहे.
काय म्हणाले राहुल गांधी? । Rahul Gandhi on Shivsena
“माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यांना ५० कोटींची ऑफर होती असं म्हणाले. ते गेले नाहीत पण बाकीचे गेले. एकप्रकारे विरोधकांमध्ये साफसफाई होत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत १०-१५ कोटी घेऊन चाललेल चांगली बाब आहे. भारतात स्वच्छ नेत्यांची कमी नाही त्यामुळे ते आमच्यासोबत येतील” असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंची भूमिका
राहुल गांधी यांनी मांडलेली या भूमिकेमध्ये व शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमध्ये साम्य असल्याचं दिसत. उद्धव ठाकरे यांनी, एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर आपल्या पक्षातील ज्या-ज्या आमदारांना शिंदे गटात सामील व्हायचं आहे त्यांनी खुशाल जावं अशी जाहीर भूमिका मांडली होती. यानंतर शिंदे यांच्यासोबत पहिल्या खेपेत न गेलेले आमदार एकामागून एक गुवाहाटीला पोहोचले होते. नुकत्याच झालेल्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हीच भूमिका पुन्हा एकदा मांडली होती.
५० खोक्यांची चर्चा । Rahul Gandhi on Shivsena
शिंदे गटातील आमदारांनी पुकारलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नेत्यांनी त्यांच्या विरोधात ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणा चालवली केली आहे. या घोषणेवरून राज्यात बराच गदारोळ झाला आहे. ५० खोक्यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तर यांनी नुकतीच यावरून खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केली होती. अशातच आता राहुल गांधी यांनी देखील सेनेतील आमदारांना ५० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप केला आहे.