देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची करोनाबाबत बैठक
गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करणार
देहूरोड – येथील विविध किराणा दुकानांतील, भाजी मंडई व परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. स्थलांतरित व गरजू मजुरांसाठी “रिलीफ कॅम्प’ सुरू केला. गरजूंना धान्याचे किट वाटप करण्यात येणार असल्याचे देहूरोड कॅंटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी सांगितले.
करोना विषाणूच्या संसर्ग रोखण्याबाबत व विविध समस्यांबाबत बोर्ड प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत हरितवाल बोलत होते. बैठकीला बोर्ड उपाध्यक्ष रघुवीर शेलार, बोर्ड सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे यासह कार्यालय अधीक्षक राजन सावंत, पोलीस अशोक नवले उपस्थित होते.
बैठकीत सीईओ हरितवाल म्हणाले की, बाजारपेठेतील काही किराणा दुकानदार व ग्राहक सामाजिक अंतराचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित दुकानदारांना समज देण्यात येईल. पालन न करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येईल. भाजी मंडईत गर्दी होत असल्याने गर्दी कमी करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना बोर्डाने परिसरात विविध ठिकाणी मोकळ्या जागेत भाजी विक्री करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
बोर्डाच्या 7 प्रभागांत तसेच एम. बी. कॅम्प, गांधीनगर, सेंट्रल चौकाजवळ, थॉमस कॉलनी, शितळानगर, दत्तनगर, शेलारवाडी, शिवाजी चौक येथे भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही बदल झाल्यास अगर संबंधितांनी नकार दिल्यास दुसऱ्या विक्रेत्यांना त्याठिकाणी भाजी विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसेच जागा भाडे आकारण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.
फवारणीबाबत व स्वच्छतेबाबत काहीही तक्रार असल्यास तातडीने संपर्क करावा, असे उपाध्यक्ष शेलार यांनी सांगितले.
बोर्ड सदस्य खंडेलवाल यांनी सिद्धीविनायकनगरी भागात काम नसताना मोकाट घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन करून फोटोसेशन करणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. सदस्य हाजिमलंग यांनी गांधीनगर-आंबेडकरनगर, इंदिरानगर भागात गरजूंची संख्या अधिक असल्याचे सांगितले. सर्व सदस्यांनी गरजूंना धान्य किटचे प्राधान्याने वाटप करण्याबाबत सहमती दर्शविली.