देहू : संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे पुनर्लेखन करणारे, त्यांना आयुष्यभर साथसंगत देणाऱ्या १४ टाळकऱ्यांवर ‘ज्ञानबातुकाराम’ या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाने नुकताच विशेषांक प्रकाशित केला. आज (दि. १४) वसंत पंचमी या तुकोबारायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा अंक देहूत मान्यवरांच्या हस्ते तुकोबांच्या चरणी अर्पण करण्यात आला.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग यांनी संपादित केलेला हा विशेषांक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘तुकोबार्पण’ करण्यात आला.
‘ज्ञानबातुकाराम’ या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिक अंकाच्या माध्यमातून दरवर्षी संत साहित्यावर विशेषांक प्रसिद्ध करण्यात येतो. नव्या पिढीपर्यंत संत साहित्य पोहोचविण्याचे मोलाचे काम डॉ. गायकवाड यानिमित्ताने करत आहेत, असे डॉ. मोरे यावेळी म्हणाले.
यावेळी देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ अवसक, जन्मस्थान मंदिराचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजी शंकर मोरे, प्रल्हाद मोतीरामबुवा मोरे, संजय महाराज दामोदर मोरे, कात्रज डेअरीचे व्यवस्थापक महादेव कोकाटे, भाविक आणि देहूकर उपस्थित होते.
जन्मस्थान मंदिरात संत तुकाराम महाराजांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. वैकुंठवासी श्रीधर अण्णा मोरे यांनी लिहिलेल्या तुकाराम चरित्राच्या पाचव्या आवृत्तीचे, तसेच भास्कर हांडे यांनी लिहिलेल्या ‘संकरणातील गिरकी’ या पुस्तकाचेही प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
श्रीधर अण्णा यांनी लिहिलेले ‘तुकाराम चरित्र’ सर्व भारतीय भाषांमध्ये जाण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू’ असे आश्वासन डॉ. पी. डी. पाटील यांनी यावेळी दिले. पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक विवेकानंद मोरे यांनी प्रास्तविक केले. अमृता मोरे यांनी सूत्रसंचालन केले. तर, पुढील अंक संत एकनाथ महाराजांवर प्रसिद्ध करण्याची घोषणा ।।ज्ञानबातुकाराम।।चे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी आभार प्रदर्शनामध्ये केली.