पोलिसांच्या कृपादृष्टीचा आरोप; शहर तसेच ग्रामीण भागात मटका, दारूअड्ड्यांना रान मोकळे
दौंड – दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. याच कारणातून शहरात गेल्या आठवड्यात गोळीबार, जीवघेणे हल्ले अशा घटना घडल्या आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध मटका मोठ्या प्रमाणावर सुरू असून यातून आर्थीक उलाढालीच्या कारणातून गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. शहरात तर मटक्यासह अन्य अवैध धंद्यांनी कहर केला आहे. बाजारपेठेतील व्यावसायापेक्षाही मोठी उलाढाल अशा धंद्यातून होत असल्याने पोलीसांची कृपादृष्टी आहे की काय? असा सवाल नागरिकांतून केला जात असून अशा धंद्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दौंड शहरात गेल्या काही महिन्यांत गोळीबार तसेच जीवघेणे हल्ल्यांसारखे मोठे गुन्हे घडले आहेत. यासह मटका, दारूअड्डे आणि त्यातील उलाढालीवरूनही हाणामाऱ्या झाल्या आहेत. शहर तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना पोलीसांकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नसल्याने शहरातील सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. सध्या, शहरातील चौका-चौकात मोठ्या प्रमाणावर मटक्याचे अड्डे बिनदिक्कत सुरु आहेत. या मटका अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मटका अड्डे चालविणाऱ्यांच्या आजुबाजुलाच जर पोलीस फिरत असतील तर या मटका अड्ड्याच्या विरोधात कोण तक्रार करणार? असाही सवाल नागरिकांतून केला जात आहे.
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये गावागावात पत्र्याचे शेड टाकून त्यामध्ये लोखोंची उलाढाल होणारा धंदा सुरू असतो. हे व्यवसाय रस्त्याकडेला किंवा भरवस्तीतही सुरू आहेत. अशीची स्थिती दारूअड्डयांबाबतही आहे. याबाबत काही नागरिकांनी पोलीसांकडे तक्रारीही केलेल्या आहेत. परंतु, पोलीसांकडून कारवाई होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांकडून शंका निर्माण केली जात आहे. मटका अड्ड्यांवर पोलिसांचीच ये-जा अधिक असते, यामुळे यामागील गौडबंगाल उघड होऊ
लागले आहे.
मटका व्यवसाया व्यतिरिक्तत ग्रामीण भागात तसेच शहरातील काही भागात गावठी दारू विक्रीचा व्यवसायही तेजीत आहे. अवैध मटका, गावठी दारू शहर तसेच परिसरात राजरोसपणे विकली जात आहे. यावरही पोलीस कारवाई करीत नाहीत. पोलीस प्रशासनाच सुस्त असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस स्थानकांअंर्तगत होणाऱ्या चोऱ्यांचाही तपास लागलेला नसून अनेक प्रकरणे तपासाविना पडून आहेत. शहरातील पोलीस काय करीत आहेत? असा सवाल नागरिकांकडून केला जावू लागला आहे.
पोलीस उपविभागीय कार्यालयांसाठी हे लाजिरवाणे…
तंटामुक्त गाव योजनेचे कामही तालुक्यात कोठेही प्रभावीपणे सुरू नरसल्याचे चित्र आहे. पोलीस नेमके करतात तरी काय? असा प्रश्न निर्माण होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवालही केला जात आहे. एकंदरीत पोलीस अवैध धंद्यावर कारवाई करताना दिसून येत नाहीत, शासनाची तंटामुक्त गाव योजनाही प्रभावीपणे राबविली जात नाही. शहर तसेच तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलसांचीच कृपादृष्टी असल्याने तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. तालुक्यात दौंड व शिरूर पोलीस उपविभागीय यांचे कार्यालय आहे, असे असताना तालुक्यात अवैध धंद्यांना आळा बसू शकत नाही? ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकरिता लाजिरवाणी गोष्ट आहे.
दौंड शहर तसेच ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी कारवाई केल्यानंतर पुन्हा असे अवैध धंदे सुरू होत असतील तर नागरिकांनी तातडीने तक्रारी कराव्यात किंवा माहिती कळवावी, संबंधीत ठिकाणी कारवाई केली जाईल. पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.
– सुनिल महाडीक, पोलीस निरीक्षक, दौंड