भुईंज – गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे सर्वत्र झालेले प्रचंड नुकसान, पडलेल्या पावसामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात शेतीची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्गाने किसन वीर साखर कारखाना व खंडाळा साखर कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर व वृक्षारोपण करून साजरा केला.
मदन भोसले यांच्या अनुपस्थितीत किसन वीर कारखाना परिवाराने त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला. मदन भोसले यांनी किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या निसर्गसंपन्नतेसाठी कारखाना कार्यस्थळावर वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. त्यांच्या वृक्षलागवडीच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधत किसन वीर कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे यांच्या हस्ते विधीवत पुजन करून या वृक्षांचे रोपण कारखान्याच्या संचालक मंडळासह उपस्थित कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते “वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ या तुकोबारायांच्या अभंगाच्या गजरात करण्यात आले.
खंडाळा कार्यस्थळावर किसन वीर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत इंगवले यांच्या हस्ते विधीवत पुजन करून स्पॅथोडिया, ताम्हण आणि मोहगणी या वृक्षांचे रोपण दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळासह उपस्थित कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, संचालक अनिरूद्ध गाढवे, धनाजी डेरे, बंडू राऊत, चंद्रकात ढमाळ, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, दत्तात्रय गाढवे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
किसन वीर साखर कारखाना परिवार,कामगार कल्याण मंडळ आणि बालाजी ब्लड बॅंक,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कामगार कल्याण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण व सर्व पदाधिकारी आणि बालाजी ब्लड बॅंकेचे महेश भोसले व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातुन रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आले.