मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून रोजच राजकीय भूकंप होताना पाहायला मिळत आहे. त्यातच काल कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते रामदास कदम यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे समोर आल्यानंतर हा वाद आता आणखी चिघळत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. मात्र हे करत असताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचेही दिसून आले.
माझी हकापट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही असे सांगत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी “मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणं एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का?” असा प्रश्नही रामदास कदम यांनी उपस्थित केला. यावेळी आपल्या मनातील खदखद मांडताना त्यांनी आपला मुलगा योगेश कदमवरही अन्याय झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केली.
“उद्धव ठाकरे अशी किती लोकांची हकालपट्टी करणार आहेत. ५० आमदारांची हकालपट्टी केली आहे, आता १२ खासदार जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक जात आहेत त्यांची हकालपट्टी करणार आहात. मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
“मी गेल्या ५२ वर्षांपासून शिवसेनेसाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक यासाठी साक्षीदार आहे. दंगली झाल्या तेव्हा तिथे मी पोहोचलो होतो. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे फुटले तेव्हा मीच संघर्ष केला. नारायण राणे गेले तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या सीटवर मी बसलेलो असायचो याची आठवण ठेवा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढलं आणि आधी राजीनामा फेकला,” असे रामदास कदम म्हणाले आहेत.
“५२ वर्ष काम करणाऱ्या एका शिवसैनिकावर राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ५१ आमदारांनी शिवसेना वाचवली असल्याने मी त्यांचे आभार मानतो. मी त्यांना टाहो फोडून अजित पवार रोज सकाळी ७ वाजता मंत्रालयात जातात, १०० आमदार कसे निवडून आणायचे याचं टार्गेट त्यांनी ठेवलं आहे आणि जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे आपल्याला उमेदवाराला ताकद देत शिवसेनेला संपवण्याचं कटकारस्थान केलं असल्याचं सांगत होतो. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी निर्णय घेतला नसता, तर पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते,” असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नव्हती, करोना होता हे मान्य. पण शरद पवार कोकणात पक्ष कसा फोडत आहेत याचे फोटो मी तुम्हाला पाठवले होते. शिवसेनेतून कुणबी समाजाला फोडून त्यांना पदं द्यायची, पाच कोटी दिले. तुम्ही मुख्यमंत्री असतानाही शरद पवार शिवसेना फोडत आहेत. सगळे आमदार सांगत असतानाही तुम्ही शरद पवारांना सोडत नव्हता. ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करुन हिंदुत्व उभं केलं, ते आज जिवंत असते तर यांच्यासोबत युती करत हे पाप करुन दिलं असतं का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे.
“शरद पवार अखेर शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, त्यांचा डाव यशस्वी झाला. शरद पवारांना बाळासाहेब असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केलं,” असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.