वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची शक्तिशाली देश म्हणून ओळख बनली आहे. कुणी छेडल्यास भारत सोडणार नाही, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कुरापतखोर चीनला कडक संदेश दिला.
अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या राजनाथ यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारत-अमेरिकी समुदायाला उद्देशून भाषण केले. त्यावेळी त्यांनी चीनी कुरापतीनंतर भारतीय जवानांनी सीमेवर दाखवलेल्या शौर्याचा उल्लेख केला. भारतीय जवानांनी काय केले आणि आमच्या सरकारने कुठले निर्णय घेतले; ते मी जाहीरपणे सांगू शकत नाही.
मात्र, कुठले दु:साहस भारत खपवून घेणार नाही असा संदेश चीनला मिळाल्याचे मी निश्चितपणे सांगू शकतो, असे त्यांनी म्हटले. चीनी सैनिकांच्या आगळिकींमुळे 2020 या वर्षाच्या मध्यात सीमेलगत तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. त्या संघर्षात चीनला मोठा हादरा बसल्याचे मानले जाते. त्याचा संदर्भ राजनाथ यांनी दिला.
युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाने अनेक देशांची नाराजी ओढवून घेतली आहे. मात्र, रशियाशी भारताचे अतिशय चांगले संबंध आहेत. त्याविषयीचा अमेरिकेचा आक्षेप असल्याचे मानले जाते. त्यापार्श्वभूमीवर, भारताचे एखाद्या देशाशी चांगले संबंध आहेत म्हणून दुसऱ्या देशाशी संबंध खराब होतील असा अर्थ होत नाही, अशी भूमिका राजनाथ यांनी मांडली.
त्यातून त्यांनी अमेरिकेलाही अप्रत्यक्ष संदेश दिला. जगातील प्रमुख तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने भारताची आगेकूच सुरू आहे. आज भारताने जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त केली आहे, असेही त्यांनी म्हटले.