नांदेड – राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये रोज आरोप प्रत्यारोप होतायत. राजकारणाचा स्तर खालावत चालला का, असं प्रश्नही उपस्थित होत आहेत. त्यातच आज महाविकास आघाडीतील मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण नांदेड आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटुर येथे एका व्यासपीठावर आले. त्यावेळी दोन्ही नेत्यांना एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या.
दिवंगत नेते गंगाधरराव कुंटुरकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि स्मृतीग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. अशोक चव्हाण म्हणाले की, ‘तुम्ही एकत्र येणार का असे अनेकांचे प्रश्न होते. पण मीडियाचा भ्रमनिराश झाला देवेंद्रजी. त्यांना वाटलं आपण एकत्र व्यासपीठावर येतो की नाही. आजच्या समारंभाप्रमाणे राज्याचं राजकारण व्हावं. अनेक वर्षानंतर सगळ्या पक्षाचे नेते एकत्रित आले’ असंही अशोक चव्हाण म्हणाले.
देवेंद्रजी, आमच्या महाविकास आघाडीचं काम चागलं चाललंय. सरकारला आता तीन वर्षे पूर्ण होतील. तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर अजून चांगलं काम चालेल’ असं म्हणत चव्हाण यांनी फडणवीसांना कोपरखळी लगावली.
दरम्यान देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी देशाचं वातावरण बदलण्याची गरज आहे. दोन्हीकडून अर्थात सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाजूने वातावरण बदलण्याची गरज आहे. मी आणि देवेन्द्रजी शेजारी आहोत, आम्ही रोज बोलतो. राज्यात जो पॉलिटिकल वॉर (war ) चालला तो गँगवार होऊ देऊ नका, अस आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं.