मुंबई – नारायण राणे यांनी घटनेविषयी आता आदरभाव दाखवून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, आता जर राणेंमध्ये थोडीही लाज शिल्लक असेल तर त्यांनी घटनेचा आदर राखून राजीनामा दिला पाहिजे, राणे यांनी गेल्या काही काळात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सतत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.
पण तरीही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पण आता मात्र त्यांनी ज्या शब्दांचा वापर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केला आहे त्याबद्दल त्यांना कारवाईला सामारे जावेच लागेल. राणे यांनी जी जनआशीर्वाद यात्रा काढली होती, त्यात जाणिवपुर्वक नियोजीत पद्धतीने गर्दी जमवण्यात आली होती. पण ही गर्दी म्हणजेच आपल्या यात्रेला मिळालेले यश आहे असे ते समजू लागले होते. हे यश डोक्यात गेल्यानंतर राणे सैरभैर झाले होते. त्यातूनच त्यांनी ही वक्तव्ये केली आहेत असेही राऊत म्हणाले.
दरम्यान त्या आधी राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाला निवेदन पाठवून नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली होती. त्या पत्राला पंतप्रधान कार्यालयातून दहा मिनीटांमध्ये उत्तर आले आणि मोदींनी हा विषय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपस्थित करण्याची सूचना केली. त्यानुसार आम्ही अमित शहा यांच्याकडेही ही मागणी केली आहे असेही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.