रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी कोकण विभागातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या आवाहनाला पाठिंबा देण्याचे आवाहन समर्थकांना केले. (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: Narayan Rane filed nomination form)
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत होते. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, गेल्या १० वर्षात दिसलेला सर्व विकास हा केवळ एक “ट्रेलर” होता, तर संपूर्ण चित्रपट येणे अजून बाकी आहे, ही पंतप्रधान मोदींची हमी आहे.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, मोदींच्या विजयाच्या हॅट्ट्रिकमुळे देशातील गरिबीचे उच्चाटन होईल आणि देश संपूर्णपणे स्वावलंबी होईल. भारताला विकसित देश बनवण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या पाहिजेत, त्यासाठी मतदारांनी साथ द्यावी.
या जागेवर शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार चुरस होती. त्यामुळे येथील उमेदवारी जाहीर करणे लांबले होते. अखेर काल नारायण राणे यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपने केली. दरम्यान अजूनही महायुतीचे जागा वाटपाचे घोंगडे सात मतदार संघात भिजत पडले आहे. आज पहिल्या टप्प्याचे मतदान झाले तरी महायुतीला राज्यातील सात जागांचा तिढा सोडवता आलेला नाही यावरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.