पुणे, (जिल्हा प्रतिनिधी) – गेली पाच वर्षे खासदार नसलो तरी शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकांची कामे करणे सोडली नाहीत. सातत्याने मतदारसंघातील विषय सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. त्याचे फलित विकासकामांमधून दिसत आहे. आता महायुतीच्या जागावाटपात शिरूर लोकसभेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसने दावा ठोकला आहे. मात्र या जागेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील तो अंतिम निर्णय असेल. पक्षाने ठरवलं तर मी अजितदादांच्या उमेदवाराचं पण काम करेल, अशी भूमिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केली
दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज म्हाडा पुणे अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. दरम्यान सुरुवातीपासूनच आढळराव पाटलांनी शिरूर लोकसभेच्या जागेवर मीच उमेदवार म्हणून दावा केलेला आहे.
मात्र म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्षपद आल्यानंतर आज त्यांनी भूमिका मांडली. शिरूरच्या जागा वाटपाचा संबंधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच असल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. या प्रश्नाला अनुसरून आढळराव पाटील म्हणाले, जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीने ठरवतील त्यासाठी आम्ही काम करू. उद्या अजित पवारांनी उमेदवार दिल्यास जर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर त्याचं आम्हाला काम करावचं लागेल. जो उमेदवार असेल तो महायुतीचा म्हणूनच निवडून येईल, हेही सांगायला ते विसरले नाहीत.