सूरत – अरूणाचल प्रदेश या भारतीय भूभागावर आपला दावा सांगणाऱ्या चीनला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी खडसावले आहे. जर आजी मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझ्या मालकिचे होईल का? अशी विचारणा करतानाच अरूणाचल प्रदेश भारताचे राज्य होते आणि राहणार असे त्यांनी म्हटले आहे.
जयशंकर पुढे म्हणाले की नाव बदलण्याने काही होत नाही आणि त्याचा काही प्रभावही पडत नाही. आपले लष्कर तेथे नियंत्रण रेषेवर तैनात आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. तसेच आपण तेथे काय करायचे आहे याची सैन्याला कल्पना आहे. चीनने आज पुन्हा एकदा केलेल्या आगळिकीबाबत जयशंकर यांना येथील एका कार्यक्रमाच्या वेळी प्रश्न विचारण्यात आले होते. त्याला त्यांनी उत्तरे दिली.
यावेळी त्यांनी चीनला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. चीनने यापूर्वीही भारताच्या काही भूभागांचे नाव बदलले आहे, मात्र भारताने त्या देशाचे हे सगळे उद्योग फेटाळले आहेत. अरूणाचल प्रदेश भारताचे अभिन्न अंग आहे आणि काल्पनिक नावे दिल्यामुळे वास्तवात बदल होत नाही असे जयशंकर म्हणाले.
मोदींच्या भेटीनंतर सुरू झाले प्रकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अरूणाचल प्रदेशला भेट दिली होती. तेंव्हापासूनच चीनकडून अरूणाचलच्या संदर्भात दावेदारी सुरू झाली आहे. पंतप्रधानांनी आपल्या दौऱ्यात १३००० फूट उंचीवर बनवलेला सेला प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला होता.
तेंव्हापासूनच चीन थयथयाट करतो आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनेही गेल्याच आठवड्यात अरूणाचल प्रदेश हा भारताचाच भाग असल्याची निसंदिग्ध ग्वाही दिली आहे.