मुंबई – काँग्रेस सोडून जर नेते भाजपमध्ये येत असतील तर याचा अर्थ काय की भाजपचे काम चांगले सुरू आहे. याऊलट चांगले काम करणारे लोक काँग्रेसला चालत नाही. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस संपलेली असेल, असा टोला पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते आणि आता भाजप नेते आशिष देशमुख यांनी लगावला.
आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामांची पक्ष प्रवेशाची लगबग सुरू झाली. याच दरम्यान 14 जानेवारी रोजी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर काही महिन्यापूर्वीच भाजपवासी झालेल्या आशिष देशमुखांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची यादीच जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसमधील दोन माजी राज्यमंत्री, दोन माजी अध्यक्ष काँग्रेसला रामराम करतील, ते भाजपच्या संपर्कात आहेत, असा मोठा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसला मोठं भगदाड पडणार असल्याची शक्यता आहे.