नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे की आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हा सगळ्यांत मोठा पक्ष ठरेल. मात्र थरूर यांच्या या विधानाशी कॉंग्रेसने असहमती दर्शवली आहे. तर पक्षाचे नेते प्रमोद तिवारी यांनी तर भाजपविरोधी आघाडीच्या विजयाचेच गणित मांडले आहे.
माध्यमांशी बोलताना तिवारी म्हणाले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना ६८ टक्के मते मिळाली होती तर २०१९ मध्ये मतांची टक्केवारी कमी झाली तरी विरोधी पक्षांनी ६२ टक्के मते मिळवली होती. एवढी मते मिळाल्यानंतरही विरोधी पक्षांचा पराभव झाला. मतांची विभागणी हेत त्याचे कारण होते. भारतीय जनता पार्टीला केवळ ३७.८ टक्के मते मिळाली आणि ६२ टक्के मते त्यांच्या विरोधात होती.
असे असूनही विरोधी पक्ष पराभूत झाले. मात्र आता जर ही ६२ टक्के मते एकत्र करण्यात आली तर चित्र अगदी वेगळे असेल. जे पक्ष विरोधी आघाडीचे घटक झालेले नाहीत त्यांची पाच ते सात टक्के मते जरी विरोधकांच्या ६२ टक्के मतांतून वगळली तरी आघाडीकडे ५५ टक्के मते राहतात. त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित केला जाऊ शकतो. त्या दिशेनेच सगळी प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, थरूर म्हणाले होते की भाजपला गेल्या वेळेपेक्षा कमी जागा मिळतील मात्र तोच सगळ्यांत मोठा पक्ष ठरेल.