मुंबई – सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी चर्चेत येत आहे. अशात काल (दि. 1 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकारण चांगलेच तापले असून या भेटीचे अनेक अर्थ काढून तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र, या भेटीचे मागचे कारण स्वतः ट्विट करून शरद पवारांनीच सांगितले आहे.
दरम्यान, असे असले तरी काही राजकीय नेते या भेटीवर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या कालच्या भेटीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते. “मी आणि एकनाथ शिंदेंना भेटलो तर खळबळ माजेल..’, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.
नेमकं संजय राऊत काय म्हणाले, वाचा…
ते म्हणाले, “यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर भलेही बेकायदेशीरपणे एखादी व्यक्ती बसली असेल, सरकार बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्री बेकायदेशीर आहेत, हे सरकार सर्वोच्च न्यायालयाने डिसमिस केलं आहे. तरी ते बसले आहेत. निकाल लागेल. पण जोपर्यंत ते बसले आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत आहेत’.
‘शरद पवार अनेक क्षेत्रात काम करतात. राजकारण हा वेगळा विषय, सहकार क्षेत्र, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्राशी संबंधित कामांसाठी कुणी मुख्यमंत्र्यांना भेटत असेल तर त्यामध्ये इतकी खळबळ माजण्याची गरज नाही. मी भेटलो तर खळबळ माजेल. आमच्या सारखे लोकं भेटली तर कदाचित प्रश्न निर्माण होईल की का भेटलात?’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले..
“मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आज (1 जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली.’ असं त्यांनी ट्विट मध्ये सांगितले आहे.