पाटणा :- केंद्रातील सत्तारूढ भाजपसाठी जम्मू-काश्मीर म्हणजे प्रयोगशाळा आहे. तो पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास संपूर्ण देशाचे काश्मिरीकरण होण्याचा धोका आहे, असे भाष्य जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी केले.
काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने राज्यघटनेतील कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला. त्या घडामोडीने स्थिती बिघडू नये यासाठी जम्मू-काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये फारूक आणि उमर अब्दुल्ला हे पिता-पुत्र, मेहबुबा या तीन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. त्यांचा संदर्भ देऊन मेहबुबा यांनी पाटण्यात पत्रकारांशी बोलताना भाजपला लक्ष्य केले.
खरेतर, भारताच्या संकल्पनेवरच हल्ला करण्यात आला. कलम 370 हटवण्यात आल्याने ते स्पष्ट झाले. केंद्रीय अध्यादेशाच्या माध्यमातून आज दिल्लीत जे घडताना दिसत आहे; ते आमच्या राज्यात खूप आधी घडले. दुर्दैवाने, थोडेच लोक ते समजू शकले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याच्या संसदेतील विधेयकाला आपने अनुकूलता दर्शवली. त्याविषयीचा प्रश्न मेहबुबा यांना विचारण्यात आला. जे काही घडतयं त्याचे परिणाम अनेकांच्या ध्यानात आले नाहीत. मात्र, मनात कुठलाही आकस न ठेवता मी विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी आले, असे उत्तर त्यांनी दिले.