मुंबई – केंद्र सरकार आयडीबीआय या सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेतील 50 टक्के भाग भांडवल विकणार असल्याची शक्यता काही वृत्त माध्यमांनी कालपासून व्यक्त केली आहे. त्यामुळे त्या बॅंकेच्या शेअरच्या भावामध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून आले.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आयडीबीआय बॅंकेतील 50 टक्के भाग भांडवल लवकरच विकणार आहे. केंद्र सरकार आणि लाइफ इन्शुरन्स कार्पोरेशनकडे या बॅंकेचे 94.7% भाग भांडवल आहे. सध्या बॅंक एलआयसीची उपकंपनी आहे. प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकार आणि एलआयसी आपला आयडीबीआय बॅंकेतील किती टक्के हिस्सा विकावा यावर चर्चा करीत आहेत.
यासंदर्भात सप्टेंबरअखेर काहीतरी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आयडीबीआय बॅंकेतील भाग भांडवल विकण्याच्या मनोदय व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बॅंकांचे खासगीकरण करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये केंद्र सरकारकडून काही प्रमाणात पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयडीबीआय बॅंक अडचणीत आले असताना एलआयसीने या बॅंकेला मदत केली आहे.
मात्र प्रदीर्घकाळ एलआयसी आयडीबीआय बॅंकेला मदत करू शकणार नाही. त्यासाठी आयडीबीआय बॅंकेचे भाग भांडवल विकण्याचा मनोदय या अगोदरच केंद्र सरकारने आणि एलआयसीने व्यक्त केला आहे. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाला सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकातील कर्मचाऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.