नवी दिल्ली – आयडीबीआय बॅंकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया चालू आहे. त्या बॅंकेचे किती टक्के भागभांडवल विकायचे याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे केंद्र सरकारतर्फे आज स्पष्ट करण्यात आले. अर्थ मंत्रालयातील गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी सांगितले की एलआयसीच्या आयपीओप्रमाणेच आयडीबीआय बॅंकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया चालू होती. आताही आयडीबीआय बॅंकेचे खासगीकरण करण्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या बॅंकेच्या संदर्भातील माहिती गुंतवणूकदारांना सध्या देणे चालू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती टक्के भागभांडवल विकायचे याचा निर्णय घेण्यात येईल.
आयडीबीआय बॅंकेचे व्यवस्थापन एलआयसीकडे आहे. हे व्यवस्थापन काढून घेऊन खासगी गुंतवणूकदाराकडे देण्याचा आमचा मनोदय कायम आहे. आयडीबीआय बॅंकेत केंद्र सरकारचे भागभांडवल 45 टक्के आहे तर एलआयसीचे भागभांडवल 49 टक्के आहे. केंद्र सरकार आपले सर्व भाग भांडवल किंवा किती टक्के भाग भांडवल विकणार आहे या संदर्भात लवकरच माहिती गुंतवणूकदारांना कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी मे महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने आयडीबीआय बॅंकेचे खासगीकरण करून याचे व्यवस्थापन खासगी कंपनीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून या संदर्भात आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना करण्यात येत आहेत. एलआयसीचा आयपीओ मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील आणि परदेशातील वातावरण खराब असूनही एलआयसीचा आयपीओ जारी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आम्हाला देशातील गुंतवणूकदारांकडून तर चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर परदेशातील गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.