पुणे- आज पुण्यात झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.अजित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरतील का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पुढे अजित पवार म्हणाले की मी 2024 ची वाट कशाला बघू आतादेखील राज्याचा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोन्हीसोबत मी काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत वरिष्ठांनी सांगितले म्हणून काम केले, असेही त्यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. पण प्रत्येकवेळी एकतर आमच्या जागा कमी आल्या किंवा मुख्यमंत्रिपदाची संधी असताना वरिष्ठ पातळीवर काही वेगळा निर्णय झाला आणि ती संधी गमावली, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
दरम्यान, माझा आजचा कार्यक्रम पूर्वनियोजित असून तो अडीच महिन्यांपूर्वीच ठरला होता. त्यामुळेच मी मुंबईला पक्षाच्या शिबिराला हजर राहू शकलो नाही. पण, उगीच गैरसमज निर्माण केला जातो. माझ्यावर का एवढं प्रेम ऊतू चाललंय काय माहित? इथे प्रेम ओतू घालावण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या, अश्या शब्दात अजित पवारांनी चिमटा काढला.