नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी त्यांच्या सरकारी बंगल्यातील सर्व चीजवस्तू हलवल्या. आता ते उद्या (शनिवार) औपचारिकरित्या सरकारी बंगला सोडतील.
सुरतमधील न्यायालयाने 23 मार्चला राहुल यांच्या विरोधातील मानहानीच्या खटल्याचा निकाल दिला. त्यांना दोषी ठरवत 2 वर्षे तुरूंगवास ठोठावण्यात आला. त्या शिक्षेमुळे राहुल यांची खासदारकी रद्द झाली.
त्यानंतर खासदार म्हणून मिळालेला सरकारी बंगला सोडण्याची नोटीस त्यांना लोकसभा सचिवालयाने पाठवली. बंगला सोडण्यासाठी 22 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली. त्यानुसार, राहुल यांनी याआधीच दिल्लीतील 12, तुघलक लेन हा बंगला सोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
याआधी काही आणि आता सर्व उर्वरित चीजवस्तू त्यांनी हलवल्या. राहुल सर्वप्रथम 2004 मध्ये खासदार बनले. तेव्हापासून जवळपास दोन दशके ते एकाच सरकारी बंगल्यात राहत होते. बंगला सोडण्याची प्रक्रिया सुरू केल्यापासून ते मातोश्री आणि कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10,जनपथ या निवासस्थानी राहत आहेत.