अमरावती – अपक्ष आमदार बच्चू कडू मंत्रीपदामुळे नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. याबाबत आज सकाळी 11 वाजता भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भूमिकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी आज सांगितले आहे. त्यामुळे आता मंत्रिपदाच्या शर्यतीतून बच्चू कडू हे बाहेर पडले आहेत.
काय म्हणाले बच्चू कडू ?
मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंकडे आम्ही दोन आमदार गेलो. त्यांनी आमच्याकडे स्वत: फोन करून पाठिंबा मागितला. त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर बऱ्याचदा इतर पक्षांकडून आम्हाला आमिषं आली. पण आम्ही आमच्या पाठिंब्यावर ठाम राहिलो. तसेच, उद्धव ठाकरेही दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो.
पण त्यानंतर राज्यात नवीन सत्तासमीकरणं जुळायला लागली. आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय झालं असतं, तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. पण एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं. माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. मी गुवाहाटीला जाण्यामुळे या देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आलं. त्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर आयुष्यभर एकनाथ शिंदेंचे आभार मानत राहीन.
पण सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही, पण मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे. त्यामुळे मी आज मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो. पण आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. त्यामुळं १७ जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे, असे बच्चू कडू म्हणाले.