प्रा. अविनाश कोल्हे
करोना विषाणूने सर्वत्र जो हाहाकार माजवला आहे त्याचा एक परिणाम म्हणजे अनेक महत्त्वांच्या घटनांकडे आपले दुर्लक्ष होत आहे. यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत स्थापन झालेल्या “ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस’ (आयटक) या कामगार संघटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. या हेतूने मागच्या वर्षी 31 ऑक्टोबर 2019 रोजी मुंबईत महत्त्वाच्या कामगार संघटनांची बैठक झाली व शताब्दी वर्षांचे कार्यक्रम पक्के केले. मात्र, आता करोनामुळे हे सर्वच संकटात सापडले आहेत.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर 1971 मध्ये लेनिन यांच्या नेतृत्वाखालील कामगार क्रांतीने जगभरच्या कामगार वर्गाला नवे भान, नवा आत्मविश्वास दिला. कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वांनुसार झालेल्या राजकीय क्रांतीने जगभर खळबळ उडाली होती. ज्या वर्गाच्या कष्टांवर आपण शतकानुशतके मजा केली, आता तोच वर्ग जागृत झाला व सत्ता घेतोय म्हटल्यावर जगभरच्या “आहेरे’ वर्गांच्या प्रतिनिधींची बोबडी वळली.
रशियन क्रांतीनंतर जगभर कामगार संघटना स्थापन व्हायला लागल्या. भारत याला अपवाद असणे शक्यच नव्हता. याचा अर्थ असा नव्हे की भारतातील पहिली कामगार संघटना “आयटक’ आहे. तो मान नारायण मेघाजी लोखंडे यांना द्यावा लागतो. ज्यांनी “आयटक’ स्थापन होण्याच्या तब्बल 30 वर्षे अगोदर मुंबईत देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. 1890 सालामध्ये त्यांनी स्थापन केलेली पहिली कामगार संघटना म्हणजे “बॉम्बे मिल हॅंड्स असोसिएशन’.
लोखंडेंनी दिलेल्या लढ्यांमुळेच कामगारांना रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. त्यानुसार 10 जून 1890 रोजी कामगारांना पहिली सुट्टी मिळाली. या घटनेला 130 वर्षे झाली. यासंदर्भात हेही नमूद केले पाहिजे की, इंग्रजांनी 1881 साली फॅक्टरीज ऍक्ट संमत केला होता. थोडक्यात, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापासून भारतीय कामगारांची दखल घेतली जाऊ लागली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मुंबईतला कामगारवर्ग राजकीयदृष्ट्या जागृत झाला आहे, असे जाणवू लागले. जेव्हा जुलै 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना देशद्रोहाच्या आरोपावरून सहा वर्षांची शिक्षा झाली तेव्हा मुंबईच्या कामगारांनी सहा दिवसांचा उत्स्फूर्त संप केला होता. कारण टिळक देशाचे पुढारी होते व देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. या संपाची दखल लंडनमध्ये अभ्यास करत असलेले लेनिन यांनी घेतली होती. “रशियन कामगार व भारतीय कामगार आता राजकीयदृष्ट्या जागृत झाला आहे. आता कामगारक्रांती दूर नाही’ असे भाकितही त्यांनी केले होते.
भारतीय कामगारांच्या जागृतीला आणखी एक आयाम होता. पहिले महायुद्ध 1918 मध्ये संपले व सर्वत्र प्रचंड भाववाढ झाली. 1918 साली मुंबईतील गिरणी कामगारांनी मोठा संप केला होता. याचे लोण लवकरच इतरत्रही पसरले. जानेवारी 1919 मध्ये झालेल्या संपात सुमारे सव्वालाख कामगार उतरले होते. 1920 सालच्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे 200 संप झाले होते ज्यात सुमारे पंधरा लाख कामगार सहभागी झाले होते.
कामगारांनी असे वेगवेगळे संप करण्यापेक्षा एक देशव्यापी संघटना असावी असे ठरले. यासाठी एक मोठे अधिवेशन मुंबईत भरवावे असेही ठरले. यासाठी एक स्वागत समिती गठीत केले जिचे अध्यक्ष होते जोसेफ बाप्टिस्टा.
या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत भरलेल्या अधिवेशनात “ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस’ची स्थापना झाली. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपतराय. या अधिवेशनाला मोतीलाल नेहरू, बॅ. जिना, डॉ. ऍनी बेझंट वगैरे मंडळी उपस्थित होती. नंतर “आयटक’च्या कामात जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू वगैरे नेते सहभागी झाले.
“आयटक’चे दुसरे अधिवेशन 1921 साली झारिया येथे संपन्न झाले. या अधिवेशनात “संपूर्ण स्वराज्य’ मागणारा ठराव पारित झाला. या आशयाचा ठराव अखिल भारतीय कॉंग्रेसने 1929 साली पारित केला.
एका बाजूने हे घडत होते तर दुसरीकडे इंग्रज सरकारसुद्धा कामगार चळवळीबद्दल कायदे करण्यात गुंतले होते. इंग्रजांनी 1926 साली “ट्रेड युनियन ऍक्ट’ पारित केला. यामुळे कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारवर्गाच्या शक्तीची दखल घेतली व “इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ची स्थापना झाली.
1928 साली मुंबईत गिरणी कामगारांच्या संपामुळे भारतातल्या कामगार संघटनांचा चेहरामोहरा बदलला. या संपात कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य भाई श्रीपाद अमृत डांगे यांचे नेतृत्व समोर आले. या संपामुळे इंग्रज सरकार सावध झाले व 1929 साली “ट्रेड डिस्प्युट ऍक्ट’ पारित केला. या कायद्याने पोस्ट, बससेवा सारख्या सेवांमध्ये संप करणे बेकायदेशीर ठरवले.
अशा आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना जर संप करायचा असेल तर पूर्वसूचना देणे सक्तीचे केले. एव्हाना देशातील कामगार चळवळीवर कम्युनिस्टांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हे अनेकांना मान्य नव्हते. यातील एक मोठे नेते म्हणजे ना. म. जोशी. त्यांनी फेब्रुवारी 1931 मध्ये “ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन’ची स्थापना केली. ही संघटना उघडपणे कम्युनिस्टांच्या विरोधात होती.
एक स्थिती अशी निर्माण झाली की कामगार चळवळीत राजकीय पक्षांचे तत्त्वज्ञान शिरले व बहुतांश कामगार संघटना कम्युनिस्टांच्या ताब्यात होत्या. सरदार पटेल यांनी गांधीवादी विचारांचा आधार घेत 3 मार्च 1947 रोजी “इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस’ (इंटक) स्थापन केली. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या समाजवाद्यांनी सुरुवातीला “हिंद मजदूर पंचायत’ स्थापन केली. यातूनच पुढे “हिंद मजदूर सभा’ स्थापन झाली.थोडक्यात, 1950चे दशक सुरू झाले तेव्हा देशात चार-पाच केंद्रीय पातळीवरच्या कामगार संघटना कार्यरत होत्या.
यानंतर देशातील राजकीय वातावरण म्हणजे तीव्र राजकीय स्पर्धेचे ठरले. यापासून कामगार चळवळसुद्धा मुक्त नव्हती. नंतर जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाने कामगार संघटना स्थापन केली. राजकीय पक्षांनी पक्षीय स्वार्थासाठी कामगार संघटनांना दावणीला बांधले होते. यावर उतारा म्हणूनच मग 1970 च्या दशकात डॉ. दत्ता सामंत सारख्यांचे नेतृत्व उदयास आले. सामंतांनी कामगार चळवळीत आक्रमकता आणली. यामुळे आयटक, इंटकसारख्या प्रस्थापित कामगार संघटना झाकोळल्या. आज तर सर्वत्र अंधारच आहे.
“आयटक’च्या मागे एवढा गौरवशाली इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतरही “आयटक’ने कामगारांच्या हितासाठी अनेक लढे दिले. 1991 साली आलेल्या उदारीकरणाच्या धोरणाने मात्र कामगार संघटनांचे कंबरडेच मोडले. कंत्राटीकरण… नोकरीत कायम न करण्याची मालकांची वृत्ती… या अन्यायांकडे डोळेझाक करण्याची सत्ताधारीवर्गाची वृत्ती वगैरेमुळे एकविसाव्या शतकांत अद्यापतरी कामगार चळवळ फारसा प्रभाव दाखवू शकलेली नाही. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा कामगारांच्या न्याय्यहक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून “आयटक’ समाजासमोर येईल, अशी आशा आहे.