जगदीश देशमुख
मोठी लोकसंख्या ही सध्या भारताची ताकद आहे. पण भारतातील लोकसंख्या वाढीची गती पाहता पुढील काही वर्षांतच भारत लोकसंख्येच्या बाबतीत जगातील प्रथम क्रमांकाचा देश असेल. ह्या वाढत्या लोकसंख्येचे नियोजन केले नाही तर हीच ताकद भारताची कमतरता ठरेल आणि पुढील काही वर्षांत हे भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान असणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अलीकडे केलेल्या सर्वेक्षणात जगाच्या लोकसंख्येत वाढ झालेली आहे. 2019 मध्ये जगाची लोकसंख्या ही 771 कोटी इतकी झाली आहे. 2018 मध्ये ही आकडेवारी 763 कोटी इतकी होती. आजच्या घडीला जगातील जास्त लोकसंख्या ही दहा देशांत आहे. त्यात पहिला क्रमांक चीनचा आणि दुसरा क्रमांक भारताचा आहे. त्यातही भारताच्या लोकसंख्या वाढीचा वेग पाहता 2027 पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो. पुढील दहा वर्षांत भारताची लोकसंख्या दीडशे कोटी होण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये भारताची लोकसंख्या 1 अब्ज 37 कोटींच्या पुढे गेलेली आहे. जगाच्या दृष्टीने विचार केल्यास भारताच्या मालकीची भूमी ह 2.7 टक्के आहे, तर लोकसंख्या 17 टक्के आहे. म्हणजे उपलब्ध जमीन आणि लोकसंख्या यात भयंकर विषमता आहे. त्यादृष्टीने याचा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे.
भारताची लोकसंख्या वाढीची कारणे समजून घेणे गरजेचे आहे…
जन्म-मृत्युदर – आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. जन्मदर मात्र वाढतच आहे. जननदर 27.5 आहे व मृत्युदर 0.5 आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होत आहे.
अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा – समाजामध्ये काही अंधश्रद्धा आजही दिसून येतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास, अग्नी देण्यास, घराला वारस पाहिजे म्हणजे मुलगाच पाहिजे. मुलगी ही “परक्याचे धन’ समजले जाते. त्यामुळे मुलगा होईपर्यंत कुटुंबनियोजन केले जात नाही. काही वेळेस पहिल्या पत्नीला मुलीच झाल्या तर दुसरा विवाह केला जातो व त्या पत्नीकडूनही कुटुंब वाढविले जाते. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसून येते.
जन्म ही ईश्वरी देणगी आहे – काही समाजामध्ये कुटुंब नियोजन करणे पाप मानले जाते. जन्म ही ईश्वरीय देणगी समजले जाते. या अंधश्रद्धेपोटी लोकसंख्या वाढ होते.
वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान – वैद्यकीय सुविधा असूनदेखील त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीत. काही वेळेस कुटुंब नियोजनांच्या साधनांची माहिती असते. परंतु त्याची उपलब्धता नसल्यामुळे म्हणजेच या सुविधांचा अभाव असल्यामुळे तिचा वापर केला जात नाही. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देऊन देखील त्याचा वापर केला जात नाही.
बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण – ग्रामीण भागांमध्ये बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक मुलांना जन्म दिला जातो.
मुलीचे लग्नाचे वय – ग्रामीण भागामध्ये 15 ते 16 व्या वर्षीच मुलीचे लग्न करून दिले जाते. लग्न झाल्यावर लवकर मुले होतात. त्यावर नियंत्रण करण्याकरिता तिला कुटुंब नियोजनाबद्दलच्या साधनांचा व माहितीचा अभाव व अज्ञान असते. या वयामध्ये ती कोणत्याही गोष्टींचे निर्णय कुटुंबांमध्ये घेऊ शकत नाही. त्यामुळे अनेक अपत्य जन्माला येतात.
निरक्षरता – आपल्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. निरक्षरतेमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते.
लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी काय उपाययोजना –
मानसिकता बदलणे – सर्वप्रथम समाजाने आपली मानसिकता बदलावी ती वंशाच्या दिव्याची. मुलगी म्हणजे वंशाचा दिवा अशी मानसिकता बनवायला मुलगा-मुलगी असा भेद करणे बंद केले पाहिजे.
कुटुंब नियोजन – लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कुटुंबाने निवडलेली ही सोपी पद्धत आहे. असे प्रतिबंधात्मक उपाय अवलंबल्याने जन्मदर नियंत्रित करता येऊ शकतो. ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते; या पद्धतीचे यश स्वस्त गर्भनिरोधक साधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
प्रोत्साहन – गर्भनिरोधक उपाय वापरण्यासाठी शासन लोकांना विविध प्रकारे प्रोत्साहन देते. आर्थिक प्रोत्साहन व इतर सोयी जसे सुट्ट्या, प्रमोशन इत्यादी गोष्टी नोकरदार वर्गाला पुरवल्या जातात, त्यामुळे लहान कुटुंबाचे नियम लागू करता येतात.
लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी वेळीच उपाययोजना करायलाच पाहिजे. नाहीतर आपल्या देशासमोर अनेक संकटे “आ’ वासून उभी राहतील. राहण्याची समस्या, पायाभूत सुविधा, जीवनावश्यक गरजा, शिवाय लोकसंख्या वाढते म्हणजे देशात तरुणांची संख्या वाढणार. क्रयशक्ती वाढणार आणि क्रयशक्तीला वेळीच रोजगार मिळाला नाही तर बेरोजगारीत आणखी भर पडत जाणार. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने योजना, कार्यक्रम आखणे गरजेचे आहे.