मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. दरम्यान, याच घटनेचे पडसाद आज विधीमंडळात उमटल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यातच भाजप पक्षाने या घटनेवरून मविआ सरकारवर टीका केली आहे. याच संदर्भात भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जळजळीत टीका केली आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर
जळगावच्या शासकीय वसतीगृहातील मुलींना पोलिसांनीच कपडे काढून नाचायला लावल्याचे उघड झाल्याने, मंत्र्यांना वाचवा आणि बाईला नाचवा, हा ठाकरे सरकारचा अधिकृत कार्यक्रम आहे का, अशी शंका येऊ लागली आहे . ते पुढे म्हणाले, या धक्कादायक घटनेमुळे असे लक्षात येते की, मविआ सरकारच्या राज्यात महिलांची अब्रू सुरक्षित नाही. मोगलाई सुरू असल्याची जनतेची खात्री पटली आहे.