मुंबई – होमगार्ड अर्थात राज्य गृहरक्षक दलासंबंधित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. होम गार्डना आता सलग सहा महिने काम दिले जाणार आहे आणि त्यासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दर तीन वर्षांनी केली जाणारी त्यांची नोंदणी आता बंद करण्यात येईल अशीही घोषणा फडणवीसांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो होमगार्डना होणार आहे.
“होमगार्ड ही स्वेच्छित सेवा आहे. इतर राज्यात 180 दिवस काम दिले जाते. पण महाराष्ट्रात तसे होत नाही. माझ्या सरकारच्या काळात आपण 180 दिवस लागू केले, पण आर्थिक अडचणीमुळे हे परत थांबवले गेले. होमगार्डची खूप मदत होते, त्यामुळे आता 350 कोटी रुपयांची तरतूद करुन होमगार्डसना सलग सहा महिने काम दिले जाईल. होमगार्डच्या सेवेसाठी 175 कोटींची मर्यादा घालण्यात आली होती ती आता बंद करण्यात आली आहे. होमगार्डना कवायत भत्ता देखील मंजूर केला आहे,’ अशी माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली आहे.
राज्यात भाजपचे सरकार असताना, 2019 साली तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी होमगार्डचा भत्ता वाढवण्याचा आणि त्यांना किमान 180 दिवस काम देण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर होमगार्डना 180 दिवस काम देण्याची योजना अंमलात येऊ शकली नव्हती. त्यावेळी आर्थिक अडचणींमुळे तो निर्णय अंमलात येऊ शकला नसल्याचे फडणवीस यांनी आता सभागृहात सांगितले. त्यामुळे होमगार्डसंबंधित निधीची 175 कोटींची मर्यादा आता काढून ती 350 कोटीवर नेण्यात आली आहे.