अलिबाग – रायगड जिल्ह्यात 24 तासांत मुसळधार पाऊस झाला असून पाच तालुक्यांमध्ये 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 164.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
उरण, अलिबाग, पेण, पनवेल आणि मुरुड येथे 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला, तर रोह्यात 24 तासांत सर्वात कमी 140.6 मिमी पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर 24 धरणे ओसंडून वाहत आहेत.
अलिबाग तालुक्यातील ताजपूर गावात गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. प्रशासनाने गावकऱ्यांना घरे रिकामी करण्यासाठी आणि स्थानिक शाळेच्या इमारतीत स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
दरम्यान, गेल्या 10 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात एकूण 341 घरांचे नुकसान झाले आहे. जूनमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 7,469 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. महाडमध्ये सर्वाधिक 2,810 लोकांना स्थलांतरित करण्यात आले. तर रोह्यामधील 1,351 आणि खालापूरमधील 1,039 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.