मुंबई – हिटमॅन रोहित शर्माकडेच भारताच्या कसोटी संघाचेही नेतृत्व सोपवले जाणार असल्याचे संकेत आता बीसीसीआयने दिले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेवरून मायदेशी परतल्यावर करण्यात येणार आहे. मात्र, आपल्या तंदुरुस्तीकडे प्रामाणिकपणे लक्ष देण्याबाबतची सूचना करत रोहितकडे सशर्त नेतृत्व सोपवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
रोहितला गेल्या काही मोसमांपासून सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागत आहे. यंदाही याच दुखापतींमुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे भारताच्या टी-20, एकदिवसीय व कसोटी या तिनही संघांचे नेतृत्व करताना रोहितला आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवावी लागणार आहे.
हॅमस्ट्रिंगची दुखापत, वर्कलोड तसेच वैयक्तिक गोष्टी यांबाबत रोहितकडून सविस्तर स्पष्टीकरण घेतले जाणार आहे. तो बेंगळुरूला सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती कार्यक्रमात मेहनत करत असून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होईल असे सांगितले जात आहे.
आता येत्या काळात बीसीसीआयचे पदाधिकारी रोहितशी संपर्क साधून या सर्व गोष्टींवर चर्चा करणार असून त्यानंतरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.