मुंबई – भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यावर बीसीसीआयने त्याला फेअरवेल सामन्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, कोहलीने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी बीसीसीआयच्या संदिग्ध भूमिकेवर सातत्याने प्रश्न निर्माण होत होते.
कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वाधिक 40 कसोटी जिंकल्या. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 5 वर्षे कसोटीतील सर्वोत्तम संघ होता.
इतके यश मिळवूनही कोहलीने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांनाच कोड्यात टाकले. कसोटी कर्णधारपद सोडण्यापूर्वी कोहलीला बीसीसीआयने फेअरवेल सामना खेळण्याचा प्रस्तावही दिला होता. मग तो देखील कोहलीने का नाकारला याचेही उत्तर अद्याप मिळालेले नाही.
कोहलीची भूमिका संभ्रमात टाकणारी
कोहलीने बीसीसीआयला फोनवर कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर बीसीसीआयने त्याला कसोटी कर्णधार म्हणून बंगळुरूमध्ये फेअरवेल सामना खेळण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, एका सामन्याने काय फरक पडणार आहे. मला तशा सामन्याची आवश्यकता नाही, असे कोहलीने उत्तर का दिले, असाही प्रश्न आता निर्माण झाला आहे. श्रीलंका संघ भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येत असून यातील पहिली कसोटी बंगळुरूमध्ये होत आहे. ही कसोटी कोहलीच्या कारकिर्दीतील 100वी कसोटी ठरणार आहे.