भारतीय कसोटी संघात जयदेव उनाडकटला सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र, तो ना धावा रोखत ना बळी मिळवत मग त्याला अंतिम संघात घेण्याचा फायदा काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्या जागी नवदीप सैनी किंवा अतिरिक्त फिरकी गोलंदाज म्हणून अक्सर पटेलला स्थान का दिले गेले नाही.
पहिली कसोटी जिंकल्यावर संघात काही जास्त बदल होणे गरजेचे होते. मात्र, दुखापतीने त्रस्त असलेल्या शार्दुल ठाकूरलाच वगळले गेले व त्याच्या जागी मुकेश कुमारला संधी दिली गेली. हाच केवळ एखमेव बदल करण्यात आला.
इशान किशनच्या जागी श्रीकर भरतला, उनाडकटच्या जागी सैनी किंवा पटेलला आणि शुभमन गिलच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी द्यायला हवी होती. मात्र, तसे घडले नाही. कसोटी मालिका केवळ दोनच सामन्यांची आहे त्यातील पहिला सामना आपण जिंकलेला आहे मग दुसरा सामना गमावला तरीही मालिका गमावण्याचा धोका नाही. इतक्या सुरक्षित स्थितीतही आपण सेकंड बेंचला खेळवणार नसलो तर त्यांना काय केवळ पर्यटक म्हणून घेऊन गेलो आहोत का?
प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिल्यावर उनाडकट हा पर्याय कसा असू शकतो? त्याने देशांतर्गत स्पर्धेत कामगिरी चांगली केली आहे; पंरतु इतकी सरस कामगिरी अन्य गोलंदाजंनीही केली आहे. त्यांना संधी देण्याचा विचारही केला जात नाही याचे कारण निवड समिती सांगेल का?
निवड समितीचे नवनियुक्त अध्यक्ष अजित आगरकर आल्यावर काही कठोर निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा केली जात आहे, मात्र, संघ व्यवस्थापन, कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीतील अन्य चार सदस्य यांच्या हाताला हात लावून ममं म्हणायचे असेल तर आगरकर कशाला हवेत शिदसुंदर दासच ठीक होते की.
उनाडकटकडे रिव्हर्स स्विंग नाही, बाउंन्सर नाही, आऊट स्विंग किंवा इन स्विंगही नाही. केवळ कटर्सच्या साहाय्याने तो कसोटीत तग धरणार आहे का? वैविध्य काय असते ते एकदा वासीम आक्रमची गोलंदाजी पाहून त्याने लक्षात घेतले तर तो स्वतःमध्ये काहीतरी बदल करेल.
मात्र, तोपर्यंत आपण सेकंड बेंचवरचा भविष्यातील एखादा चांगला गोलंदाज गमावून बसू. आणखी किती काळ उनाडकटला खेळवले जाणार आहे. तो केवळ एका गोलंदाजाचीच नाही तर एका अष्टपैलूचीही जागा अडवत आहे.