नवी दिल्ली – आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन हे दर चार वर्षांनी केले जाते. या स्पर्धेत अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. तसेच ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची पाल्य संस्था करते. आतापर्यंत या स्पर्धेचे अठरावेळा आयोजन केले आहे. मात्र आज आपण या स्पर्धेचे पहिले आयोजन कोणी केले होते या बद्दल जाणून घेणार आहोत.
नवी दिल्ली येथे केले होते आयोजन
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदाच 1951 साली आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याची जबाबदारी भारताने स्विकारली होती. हे या स्पर्धेचे पहिले पर्व होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या प्रयत्नामुळं नवी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आशियाई देशांमधील सलोखा वाढीस लागावा आणि या देशांमध्ये दृढतेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी 11 देशांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे आयोजन 4 ते 11 मार्च 1951 दरम्यान नवी दिल्ली येथे केले होते.
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते केले होते उद्घाटन
पहिल्यांदा आयोजित केली जाणारी ही स्पर्धा 1950 साली होणार होती. मात्र स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक असणारा वेळ न मिळाल्याने ही स्पर्धा 1951साली आयोजित केली गेली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत 11 देशांच्या 489 खेळाडूंचा सहभाग होता. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेत 57 प्रकारच्या खेळांचा समावेश होता. भारतात पार पडलेल्या पहिल्या आशियाई स्पर्धेचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वाधिक जास्त सुवर्ण पदके जपानने जिंकली. जपानने 24 सुवर्ण पदके आणि एकूण 60 पदकांची कमाई केली होती आणि यादीत पहिले स्थान पटकावलं होतं. त्याचबरोबर यजमान भारताने 15 सुवर्ण पदके आणि एकूण 51 पदकांवर आपलं नाव कोरलं होतं आणि या यादीत दुसरं स्थान पटकावलं होतं. या स्पर्धेचे मुख्य स्थान ध्यानचंद राष्ट्रीय मैदान होते.
या स्पर्धेत सहभागी झालेले देश
पहिल्यांदा आयोजित केलेल्या आशियाई स्पर्धेत 11 देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये अफगणिस्तान, म्यानमार, साचा, भारत, इंडोनेशिया, इराण, जपान, नेपाळ, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि थायलंड या देशांचा सहभाग होता. पहिल्यांदाच इतकी मोठी स्पर्धा आयोजित केली आणि यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. पुढील वर्षी या स्पर्धेचे आयोजन जपान येथे केले जाणार आहे. यासाठी ‘रोड टू आशियन गेम्स’ या मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे.2022 मध्ये या मोहीमेचे सुरुवात जपानमधील हॅन्गझो शहरातून होणार आहे.